घरात बसून पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाही : चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

घरात बसून पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाही : चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : घरात बसून जे पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाही. घरात बसूनच पक्ष गेला, उद्धव ठाकरे यांना पक्ष चालविण्याची सवय नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना, त्याचा दरारा आणि त्यांचे काम, याचे आम्ही तीस वर्षाचे साक्षी आहोत. इतके लोक सोडून गेले, त्यावेळी काही करू शकले नाही. इथून पुढे जे लोक सोडून जातील त्यांना देखील हे थांबवू शकणार नाही. ही क्षमता उद्धव ठाकरेंकडे नाही पक्ष चालविण्यासाठी 24 तासातले अठरा तास काम करावं लागतात. 2024 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या स्टेजवर चार-पाचच लोक दिसतील असे टीकास्त्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सोडले.

माध्यमांशी बोलताना आमदारांच्या अपात्रतेबाबत बावनकुळे म्हणाले,विधानसभा अध्यक्ष नार्वेकर कायद्याचे तज्ञ आहेत. याबाबतीत ते योग्य निर्णय घेतील. छत्रपती संभाजी नगर बैठक झाली याकडे लक्ष वेधले असता वेगवेगळ्या भागात बैठक झाल्यावर स्थानिक प्रशासन कामाला लागते. त्याचा त्या विभागाला फायदा होतो. विभागाच्या अजेंड्याला बैठकीचा फायदा होतो असे स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवार यांची ओबीसी बाबत भूमिका काय आहे? हे वेगळे सांगण्याची गरज नाही याची मोठी गाथा आहे. ओबीसींना नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सरकारमध्येच न्याय मिळाला. आता लवकरच केंद्राची विश्वकर्मा योजना येत आहे. शरद पवार केंद्रात मंत्री होते, राज्यात सरकारमध्ये होते तेव्हा त्यांना ओबीसी मंत्रालय का सुचले नाही?

शेतकऱ्यांना कर्ज वसुली नोटीस दिल्या जात आहेत याबाबतीत विचारले असता, मी या संदर्भात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून शेतकऱ्यांकडून वसुली करू नये शेतकरी अडचणीत आहेत यावर भर दिला. ज्यांनी बँकेत गैरव्यवहार केला त्यांच्याकडून तो पैसा वसूल करावा अशीही मागणी करणार आहे असे चंद्रशेखर बावनकुळे .राज्यातील 28 लोकसभा मतदारसंघांमध्ये मी प्रवास सुरू केला आहे. आज यवतमाळ, उद्या अमरावती, परवा भंडारा जिल्ह्यात प्रवास करणार. सप्टेंबरच्या 15 तारखेपर्यंत हा प्रवास सुरू असणार आहे. लोकसभा क्षेत्रातील साडेतीन लाख परिवारांना मोदी सरकारच्या नववर्षाच्या कार्यकाळाचे रिपोर्ट कार्ड आम्ही देत आहोत. एका लोकसभा क्षेत्रात 600 सक्रिय पदाधिकारी पुढचे दोन महिने प्रवास करणार आहेत. मी स्वतः घर चलो अभियान करतो आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील तीस हजार कार्यकर्ते 48 लोकसभा क्षेत्रात रोज तीन तास या प्रमाणे प्रवासाला निघतील असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नऊ वर्षात केलेल्या कामाची शिदोरी आमच्याकडे आहे. आम्ही लोकांना कामाचं पत्र देतो तेव्हा मतदार आम्ही मोदींनाच मत देऊ हे ठासून सांगतात याचा आम्हाला अभिमान आहे. मोदींच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात 45 लोकसभेच्या जागा जिंकण्याचे टार्गेट पूर्ण होईल यावर भर दिला.

Back to top button