

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : देशभरात कोळसाटंचाई आणि विजेच्या वाढत्या मागणीमुळे राज्यात 30 जूनपर्यंत रोज 8 तास भारनियमन सुरू करण्यात आले आहे. महावितरणने तब्बल तीन महिन्यांसाठी भारनियमनाचे वेळापत्रक जाहीर करून जनतेला जबरदस्त 'झटका' दिला.
काही भागात दिवसा, तर काही भागांत रात्री 'बत्ती गूल' होणार असल्याने उष्णतेच्या लाटेत होरपळणार्या महाराष्ट्राचे आणखी हाल होणार आहेत. अर्थात, महावितरणच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने मुंबईला हे भारनियमन लागू होणार नाही.
या भारनियमनाची तीन कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे उष्णतेच्या लाटेमुळे विजेची मागणी वाढली. दुसरे म्हणजे वीजनिर्मिती घटली. कोळशाची टंचाई असल्याने औष्णिक वीजनिर्मिती घटली. पाणीटंचाईमुळे 1920 मेगावॅट क्षमतेचा कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे अशक्य झाले आहे आणि तिसरे कारण म्हणजे विजेची मागणी आणि पुरवठा यातील तफावत भरून काढण्यासाठी बाहेरील राज्यातून वीज खरेदीचा मार्गही बंद झाला आहे.
खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही. महाराष्ट्रात सध्या विजेची मागणी रोज 28 हजार मेगावॅट इतकी आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे चार हजार मेगावॅटने ही मागणी वाढली. फेब्रुवारीमध्ये ही मागणी 24 हजार मेगावॅट होती. ती आता 25 हजार मेगावॅटपर्यंत पोहोचली आहे.
श्रीलंका अन् महाराष्ट्र
श्रीलंकेतील मंदीची लाट भारतात येईल काय, याची चाचपणी देशपातळीवर केली जात असतानाच भारनियमनाच्या बाबतीत महाराष्ट्र लंकेच्या जवळ पोहोचल्याचे चित्र आहे. श्रीलंकेत सध्या दिवसाला 10 ते 13 तास भारनियमन सुरू आहे. महाराष्ट्राने आता रोज 8 तास भारनियमन सुरू केले.
विभागनिहाय भारनियमन; दिवसात दोन भागांचे वेळापत्रक
ऊर्जा विभागाने जिल्हा आणि उपकेंद्रनिहाय भारनियमनाचे वेळापत्रक तयार केले आहे. दिवसाचे दोन भाग करण्यात आले आहेत. मे अखेरपर्यंत दिवसा अथवा रात्री आठ तास भारनियमन केले जाईल.