

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : संभाव्य पूरपरिस्थितीचा विचार करून सूक्ष्म नियोजन करा. त्यानुसार सर्व कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करा, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व विभागांना दिले. 15 जूननंतर अधिकारी, कर्मचार्यांना रजा मंजूर करू नका, मान्सूनपूर्व कामात हलगर्जीपणा झाल्याचे आढळल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करू, अशा इशाराही त्यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बोलताना रेखावार म्हणाले, पूर परिस्थितीमुळे जीवित, वित्तहानी होणार नाही, याची दक्षता घ्या. पूरप्रवण गावांतील नागरिकांना तत्काळ सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी राज्य परिवहनच्या बसेस त्या गावांत तैनात ठेवा. या बसेस पावसाच्या पाण्याने बंद पडणार नाहीत याचीही दक्षता घ्या. आवश्यक तिथे रुग्णवाहिका तैनात ठेवा.
जिल्ह्यातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा. नदीतील भराव, कचरा काढून घ्या. धोकादायक झाडांच्या फांद्या काढा. सर्व विभागांच्या नियंत्रण कक्षांचे दूरध्वनी क्रमांक व टोल फ्री क्रमांक सुरू राहतील, याची दक्षता घ्या. पाणीपुरवठा व वीजपुरवठा सुरळीत राहील, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या, अशा सूचनाही रेखावार यांनी केल्या. नदी, ओढ्याच्या रस्त्यावर येणार्या पाण्यात नागरिक वाहने घालणार नाहीत, याची दक्षता घ्या. अशा रस्त्यांच्या दोन्ही बाजूला बॅरिकेडस् व माहिती देणारे फलक तयार करून ठेवा.
भूस्खलन होणारे रस्ते, धोकादायक वळणांचे रस्ते, वाहन चालवताना अडथळा ठरणार्या झाडांची माहिती घेऊन तत्काळ उपाययोजना करा. धोकादायक इमारतींची जलदगतीने दुरुस्ती करून घ्या. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिक व जनावरांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करून आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करा. जनावरांच्या चारा छावण्या उभारण्यासाठीची कार्यवाही वेळेत करा. पुरामुळे पिकांचे नुकसान झाल्यास बी-बियाणे, खतांचा पुरेसा साठा तयार ठेवा, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.