बॉलीवूड नंबरी, प्रादेशिक दस नंबरी
लॉकडाऊनमध्ये उपासमारीची वेळ आलेल्या सिनेमा व्यावसायिकांसाठी सध्या थिएटर्समध्ये जमणार्या गर्दीचं चित्र नक्कीच आशादायी आहे; पण भारतीय सिनेमाचा चेहरा म्हणून मिरवणार्या बॉलीवूडपुढे मात्र या गर्दीने बरेच प्रश्न उभे केले आहेत. पूर्वी बॉक्स ऑफिसवर एकहाती गल्ला कमावणार्या बॉलीवूड ला आता प्रादेशिक सिनेमांच्या लाटेला सामोरं जावं लागणार आहे.
लसीकरणाच्या यशस्वी मोहिमेमुळे कोरोनाचा जोर आता बर्यापैकी ओसरू लागला आहे. संभाव्य तिसरी लाट आणि 'ओमायक्रॉन'ची टांगती तलवार अजूनही भारतीयांच्या डोक्यावर आहेच; पण 'लसवंत' झाल्याचं प्रमाणपत्र आता भारतीयांची ढाल बनलं आहे. सरकारने गर्दीच्या ठिकाणांवर घातलेली बंदी आता सैल पडत निघाली आहे. विस्कळीत झालेलं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे.
घरच्या चार भिंतींत एकटे पडलेले जीव आता सार्वजनिकस्थळी गर्दी करत आहेत. यात थकल्या मनाला उभारी मिळावी यासाठी थिएटरकडे वळणार्या पावलांचा मोठा वाटा आहे. कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसतानाही मनोरंजनाची हौस भागवण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करणार्या प्रेक्षकांनी सरकारला पुन्हा एकदा बुचकळ्यात टाकलेलं आहे; पण खरं आव्हान आहे ते अवघ्या देशाच्या मनोरंजनाचा ठेका एकट्याने घेतलेल्या 'बॉलीवूड'पुढं! लॉकडाऊननंतर महाराष्ट्रातल्या थिएटरमध्ये गर्दी पुन्हा एकदा दिसू लागली असली, तरी या गर्दीवर आता हक्क एकट्या बॉलीवूडचा नाही.
लॉकडाऊनचा भाग म्हणून सरकारने सार्वजनिकस्थळी गर्दी करायला बंदी घातली. रसिक मायबापांच्या मनोरंजनाची भूक भागवणार्या थिएटरना टाळं लागलं. अशावेळी लोकांनी ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे आपला मोर्चा वळवला. तिथं जगभरातल्या नव्या-जुन्या सिनेमांचा खजिना अगदी घरबसल्या खुला झाला. रात्रभर जागरण करायला भाग पाडणार्या जबरदस्त वेबसीरिज लोकांना आपल्या जाळ्यात अडकवू लागल्या.
ओटीटीवर उपलब्ध असलेल्या कंटेंटने प्रेक्षकांना इतर भाषेतल्या, प्रांतातला सिनेमा बघण्याची संधी उपलब्ध करून दिली. यात प्रामुख्याने मराठी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतल्या सिनेमांचा समावेश होता. या सिनेमांमध्ये आगळ्यावेगळ्या विषयांसोबतच भाषिक आणि प्रांतीय अस्मिता ठळकपणे दिसून येत होती. सबटायटलच्या मदतीने प्रेक्षकांनी भाषेचा अडथळा दूर करत या चित्रकृतींचा आस्वाद घेतला.
मल्याळम सिनेसृष्टी ही आपल्या उत्तम तांत्रिक गोष्टी आणि आशयघन सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. देवभूमी केरळमध्ये चित्रित होणारे मल्याळम सिनेमे प्रेक्षकांना थेट निसर्गाच्या कुशीतच नेऊन बसवतात. मल्याळी लोकांची साधी जीवनशैली कोकणातल्या गावांची आठवण करून देते. या सिनेमांमधला निसर्ग डोळ्यांना सुख देतो, तर कथेचा बाज मनाला विचार करायला भाग पाडतो. अगदी घरातच घडत असावं अशाप्रकारे कथानक उलगडत जातं.
तमिळ आणि मराठी सिनेसृष्टीत 'क्लास' आणि 'मास' आशयाचा झकास मेळ दिसून येतो. साहित्यातल्या अनेकानेक अजरामर कलाकृतींना पडद्यावर उतरवण्यात इथल्या चित्रकर्मींना यश आलेलं आहे. समाजमनावर परिणाम करणार्या चळवळींना धार आणण्याचं सामर्थ्य या सिनेमांमध्ये निश्चितच आहे. लोकसाहित्य, लोकसंगीत आणि लोकजीवनाचा अर्क या सिनेमांमध्येे पुरेपूर उतरलेला असल्याने प्रेक्षकांना ते अधिकच जवळचे वाटतात.
मेलोड्राम्यात चिंब भिजलेल्या कौटुंबिक कथा आणि जबरदस्त अॅक्शन, संवाद आणि विनोदाचा संगम असलेला मसाला फिल्म जॉनर ही तर कन्नड आणि तेलुगू सिनेमांची खासियतच आहे. समाज प्रबोधनाऐवजी मनोरंजनावर जास्त भर देणार्या नायकप्रधान सिनेमांचा भरणा इथं दिसून येतो. भाषिक आणि प्रांतीय अस्मिता प्राणपणाने जपत कधी मेनस्ट्रीम, तर कधी समांतर सिनेमा असं तळ्यात-मळ्यात खेळत राहणार्या या सिनेसृष्टीचा प्रेक्षकवर्ग बराच मोठा आहे.
बॉलीवूड म्हटलं की, घासून गुळगुळीत झालेल्या प्रेमकहाण्या, खन्ना-चोप्रा-शहा-मेहतांचे अंतर्गत कलह, हॉलीवूडपटांची नक्कल असलेले मारधाडपट हे सगळं आलंच. त्यात भरीस भर म्हणून सुरू झालेल्या अनावश्यक रिमेक्स आणि सिक्वेल्सच्या गर्दीने प्रेक्षकांना इतर पर्याय शोधणं भाग पाडलं. अशावेळी बॉलीवूड जिथून रिमेक उचलतं तो प्रादेशिक सिनेमा प्रेक्षकांनी जवळ केला.
इकडेही शेट्टी-रेड्डी-मल्लेंटी-राव-नायडू किंवा पाटील-देशमुखीसारखे सरंजामी कलह होतेच. डोकं बाजूला ठेवून बघावी लागणारी तुफान हाणामारी होती. रक्तरंजित प्रेमकहाण्या होत्या. स्त्रीपात्रांचं भोगवस्तू म्हणून केलं जाणारं चित्रण आणि अतिशयोक्तीने खचाखच भरलेले संवाद हे तर नेहमीचंच चित्र होतं. थोडक्यात काय, तर बॉलीवूड मध्ये जो भंपकपणा प्रेक्षकांनी नाकारला होता, तो इथेही होता; पण त्याला अस्मितेची जोड लाभल्यानं प्रेक्षकांना तो वेगळा आणि जवळचा वाटला.
कन्नड-तेलुगू सिनेमाला सीमाभागातल्या गावकी-भावकीच्या दुफळ्यांची पार्श्वभूमी आहे. तमिळ आणि मराठी सिनेमांवर प्रादेशिक साहित्य, संस्कृती, राजकारण आणि चळवळींचा मोठा प्रभाव आहे. केरळमधल्या राजकीय घडामोडी आणि धर्मांतराच्या घडामोडींचे सूक्ष्म पडसाद मल्याळम सिनेमांमधून पाहायला मिळतात. त्यामुळे बहुतांश प्रादेशिक सिनेमांची मूळ कथा ही बॉलीवूडपटांसारखी वाटत असली, तरी त्यांचं वेगळेपण कायमच सिद्ध होत राहिलं आहे.
खर्याखोट्या ऐतिहासिक घटनांवर आधारित असलेले बॉलीवूडपट बर्याचदा वादाच्या भोवर्यात सापडलेत; पण कोणाच्याही भावना न दुखावताही इतिहासाची रंजकतेने मांडणी करता येते आणि बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे 2017 मध्ये प्रदर्शित झालेला 'बाहुबली 2' हा तेलुगू सिनेमा. 1,000 कोटींचा गल्ला कमावणारा हा पहिलाच प्रादेशिक सिनेमा ठरला. यात प्राचीन भारतातल्या वैभवशाली राज्यांचा काल्पनिक इतिहास मांडला होता.
9 एप्रिल 2021 ला प्रदर्शित झालेल्या आणि दलित अत्याचारांवर भाष्य करणार्या 'कर्णन'ची कमाई आंबेडकरी चळवळीसाठी प्रेरणादायी ठरली. पा. रंजित, वेट्रीमारन, मारी सेल्वाराज, टी. ज्ञानवेलसारखे दिग्दर्शक आपल्या सिनेमांमधून दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडत आहेत. या सिनेमांचा आशय तर उत्तम आहेच; पण त्यांनी बॉक्स ऑफिसवर केलेली भरघोस कमाईही बॉलीवूडला आरसा दाखवते.
गेल्या नोव्हेंबरमध्ये 'जयंती' हा मराठी सिनेमा रीलिज झाला. महाराष्ट्रातल्या जात वास्तवाचं परिणामकारक चित्रण या सिनेमामध्ये केलं गेलं होतं. या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा महापुरुषांच्या शिकवणीचा जागर करण्यात आला. या सिनेमामागे राबत असलेल्या तंत्रज्ञांची टीम नवखी होती. फिल्मी भाषेत सांगायचं झालं, तर 'आऊटसायडर'! पण तरीही 'जयंती' आपला आगळावेगळा विषय घेऊन सहाव्या आठवड्यातही थेटरमध्ये ठाण मांडून बसलाय.
या वर्षभरात रीलिज झालेले सिनेमे आणि त्यांची 'बॉक्स ऑफिस इंडिया'च्या वेबसाईटवर नमूद केलेली कमाई पाहता प्रादेशिक सिनेमांचं वाढतं वर्चस्व ठळकपणे दिसून येतं. 'सूर्यवंशी'चा अपवाद वगळता इतर बॉलीवूडपटांनी दोन-तीन आठवड्यांतच आपला गाशा गुंडाळण्यात धन्यता मानली. चक्क बॉलीवूडचा भाई असलेल्या सलमान खानचा 'अंतिम'ही सपशेल आपटला.
दुसरीकडे, 'जयंती', 'झिम्मा', 'पांडू'च्या यशाने मराठी सिनेसृष्टीला नवसंजीवनी मिळाली. 'झिम्मा'सारख्या सहकुटुंब सहपरिवार पाहण्यासारख्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 10 कोटींचा गल्ला ओलांडण्यात यश मिळवलं. दादा कोंडकेंना आदरांजली वाहणार्या 'पांडू'लाही मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. सध्याचं चित्र पाहता, 'जंगजौहर', 'गोदाकाठ' आणि 'झोंबीवली'सारख्या आगामी सिनेमांना प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळेल, असं वाटतं.
तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुन आणि मल्याळम अभिनेता फहाद फासिल यांच्या जुगलबंदीने नटलेला 'पुष्पा' इतर भाषांमध्ये डब करून नुकताच भारतभर प्रदर्शित करण्यात आला. पहिल्याच दिवशी जवळपास 44 लाखांचा गल्ला जमवत 'पुष्पा'ने बॉलीवूडसमोर तगडं आव्हान उभं केलंय. येत्या काही महिन्यांत 'आरआरआर', 'राधेश्याम' अशा तेलुगू, तर 'विक्रम', 'महान' अशा तमिळ सिनेमांचा सामना बॉलीवूडला करायचा आहे. त्यात बहुप्रतीक्षित 'केजीएफ चाप्टर 2' हा कन्नड सिनेमा येत्या वर्षी बॉक्स ऑफिसवर एकहाती सत्ता गाजवेल, अशीही शक्यता आहे. एकंदरीत आता 'बॉलीवूड नंबरी, प्रादेशिक सिनेमा दस नंबरी' असं म्हणायला हरकत नाही.
प्रथमेश हळंदे

