

पणजी, पुढारी वृत्तसेवा : स्वछतेसाठी राज्य आणि केंद्र सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. मात्र राज्यातील काही पालिका सदस्य मंजूर झालेले पैसे स्वतःच्या खिशात टाकून भ्रष्टाचार करत असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. शुक्रवारी पणजी येथे घनकचरा व्यवस्थापन मंडळातर्फे एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर डॉ. शरद काळे, जुसे नोरोन्हा, लावीसन्स मार्टिन्स उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 14 व्या आणि 15 व्या अर्थ आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यातील सर्व पालिकांना विकासकामांसाठी पैसे दिले जातात. मात्र काही लोकप्रतिनिधी कचरा व्यवस्थापनाच्या नावे 60 ते 70 हजार रुपये काढतात. मात्र केवळ 20 हजार खर्च करून उरलेले पैसे आपल्या खिशात घालतात. राज्य स्वच्छ ठेवण्यासाठी कचरा व्यवस्थापनाचे काम संवेदनशीलपणे करणे आवश्यक आहे.
ते म्हणाले, आधी शहर भागात दिसणारे कचराकुंड्या आता गावातही दिसू लागल्या आहेत. अनेकजण रात्रीच्या वेळी गावातील रस्त्यांवर कचरा टाकत आहेत. हॉटेलवाले कचरा नेण्यासाठी काही लोकांना पैसे देतात. ते लोकही कुठेही उघड्यावर कचरा फेकत आहेत. असे प्रकार रोखणे ही लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कुणी कचरा फेकताना दिसला तर त्याविरोधात तक्रार करणे अपेक्षित आहे.