

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलांना लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देणारे ऐतिहासिक "नारीशक्ती वंदन अधिनियम" हे १२८ वी घटनादुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले आहे. नवी दिल्ली येथे भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यासाठी नारी शक्ती वंदन – अभिनंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच यावेळी सर्व महिलांनी मोदी है तो मुमकीन है, अशा घोषणा दिल्या. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधला. (Narendra Modi)
यावेळी PM मोदी म्हणाले, "आज मी देशाच्या प्रत्येक माता, बहिणी आणि मुलीचे अभिनंदन करतो. काल आणि परवा आपण सर्वांनी एक नवा इतिहास घडताना पाहिला आणि आपण सर्व भाग्यवान आहोत की लाखो लोकांनी आपल्याला हा इतिहास घडवण्याची संधी दिली. भारताला विकसित करण्यासाठी आज भारत स्त्री शक्तीला मोकळे आकाश देत आहे. आज देश माता, बहिणी आणि मुलींसमोरील प्रत्येक अडथळे दूर करत आहे.
पुढे बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "कधीकधी एखाद्या निर्णयात देशाचे नशीब बदलण्याची क्षमता असते. आज आपण सर्वजण अशाच एका निर्णयाचे साक्षीदार झालो आहोत. 'नारी शक्ती वंदन अधिनियम' संसदेच्या दोन्ही सभागृहांनी विक्रमी मतांनी मंजूर केला आहे. गेल्या अनेक दशकांपासून देश ज्या स्वप्नाची वाट पाहत होता ते आता पूर्ण झाले आहे. आज प्रत्येक स्त्रीचा आत्मविश्वास गगनाला भिडत आहे. संपूर्ण देशातील माता, भगिनी आणि मुली आजचा दिवस साजरा करत आहेत आणि आपल्या सर्वांना आशीर्वाद देत आहेत.
"लाखो माता-भगिनींची स्वप्ने पूर्ण करण्याचे सौभाग्य आपल्या भाजप सरकारला मिळाले आहे. त्यामुळे देशाला प्रथम मानणारा पक्ष म्हणून, भाजपचा कार्यकर्ता म्हणून, जबाबदार नागरिक म्हणून ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. नारी शक्ती वंदन कायदा हा सामान्य कायदा नाही. नव्या भारताच्या नव्या लोकशाही बांधिलकीची ही घोषणा आहे.
अमृत कालमध्ये सर्वांच्या प्रयत्नातून विकसित भारत घडवण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. लोकशाहीत महिलांच्या सहभागासाठी या कायद्यासाठी भाजप तीन दशके प्रयत्न करत होती. ही आमची बांधिलकी होती. ते पूर्ण करून आम्ही दाखवून दिले आहे. भारताला विकसित करण्यासाठी आज भारत स्त्री शक्तीला मोकळे आकाश देत आहे. आज देश माता, बहिणी आणि मुलींसमोरील प्रत्येक अडथळे दूर करत आहे.
गेल्या 9 वर्षांत आम्ही माता-भगिनींशी संबंधित प्रत्येक बंधने तोडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या सरकारने अशा योजना एकामागून एक केल्या आहेत आणि आपल्या भगिनींना सन्मान, सुविधा, सुरक्षितता आणि समृद्धीचे जीवन मिळावे यासाठी असे कार्यक्रम सुरू केले आहेत. दोन्ही सभागृहांनी नारी शक्ती वंदन कायदा संमत होणे हे देखील या गोष्टीची साक्ष आहे की पूर्ण बहुमताने स्थिर सरकार असताना देश मोठे निर्णय कसे घेतो आणि मोठे टप्पे कसे पार करतो. देशाला पुढे नेण्यासाठी पूर्ण बहुमत असलेले मजबूत आणि निर्णायक सरकार अत्यंत आवश्यक आहे हे या कायद्याने पुन्हा सिद्ध केले आहे. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा :