

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय महिला बॅडमिंटन संघाने शुक्रवारी इतिहास रचला. बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगवर 3-0 असा विजय मिळवून संघाने पहिल्या पदकावर शिक्कामोर्तब केले. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना जपान आणि चीन यांच्यातील दुसर्या उपांत्यपूर्व फेरीतील विजेत्याशी होईल. (Womens Badminton)
ग्रुप स्टेजमध्ये अव्वल मानांकित चीनचा पराभव केल्यानंतर, दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधू, अस्मिता चालिहा आणि अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रास्टो या दुहेरीच्या जोडीच्या जोरावर भारताने हाँगकाँगचा पराभव केला. (Womens Badminton)
दुखापतीमुळे प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणार्या सिंधूने तिच्या कनिष्ठ मानांकित लो सिन यान हॅप्पी हिचा 21-7, 16-21, 21-12 असा चुरशीच्या सामन्यात पराभव करून रोमहर्षक विजयाची नोंद केली. यानंतर तनिषा आणि अश्विनी या महिला दुहेरीच्या जोडीने जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानी असलेल्या येउंग नगा टिंग आणि येउंग पुई लाम या जोडीवर 35 मिनिटांत 21-10, 21-14 अशी मात करून भारताची आघाडी दुप्पट केली. यानंतर अस्मिताने येउंग सम यीवर 21-12, 21-13 असा सहज विजय मिळवला, ज्यामुळे भारतीय संघासाठी किमान कांस्यपदक निश्चित झाले.