![अनुमानापेक्षा उशिराच मानवाने घोड्यांना बनवले होते पाळीव!](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2Funnamed-file-160.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पॅरिस : मानवी इतिहासात वाहतुकीचे एक साधन तसेच युद्धातील एक सोबती म्हणूनही घोड्यांना वेगळे महत्त्व आहे. मात्र, घोड्यांना पाळीव बनवून त्यांचा मानवाने स्वतःसाठी वापर कधीपासून सुरू केला याची निश्चित माहिती उपलब्ध नव्हती. आता याबाबत एक नवे संशोधन झाले आहे. त्यानुसार 4200 वर्षांपूर्वीपर्यंत मानवाने घोड्यांना पाळीव बनवलेले नव्हते. याचा अर्थ इसवी सन पूर्व 2200 पर्यंत घोड्यांना पाळीव बनवले नव्हते. हा काळ आधीच्या अनुमानापेक्षा एक हजार वर्षे उशिराचा आहे.
मानवाने घोड्यांना पाळीव बनवण्याची सुरुवातीची कारणे त्यांचे मांस आणि दूध हे होते. त्यानंतर त्यांचा वाहतुकीसाठी चांगला उपयोग होऊ शकतो हे लक्षात आल्यावर त्यांना पाळीव बनवण्याकडे कल वाढला. सुमारे पाचशे प्राचीन घोड्यांच्या डीएनएचा अभ्यास करून याबाबतचे काही निष्कर्ष काढण्यात आले आहेत. आधुनिक घोड्यांना पाळीव बनवल्याचे पुरावे जनुकीय विश्लेषणातून इसवी सन पूर्व 2200 च्या काळातील घोड्यांमध्ये मिळालेले आहेत.
घोड्यांची दीर्घ अंतर चालण्याची किंवा धावण्याची, ओझे वाहून नेण्याची क्षमता तसेच स्वाराला सहाय्य करण्याची वृत्ती यामुळे मानवी इतिहासात क्रांतिकारक बदल घडवण्यात घोड्यांचे योगदान मिळाले. घोड्यांच्या वापरामुळे जगभरात मानवी स्थलांतर व विस्तार होण्यास चालना मिळाली. घोड्याच्या पाठीवर बसून अन्नसामग्री आणणे, शस्त्रे घेऊन लढाई करणे मानवाला शक्य झाले. इसवी सन पूर्व 3300 ते इसवी सन पूर्व 3000 दरम्यानच्या काळात कधी तरी हे सर्व सुरू झाले. फ्रान्समधील ल्युडोविक ऑरलँडो यांनी याबाबतची माहिती दिली आहे.