

नवी दिल्ली : भारतात मिठाई आणि सणांचे एक वेगळेच नाते आहे. त्यातही जर मिठाईवर चांदीचा चमचमणारा वर्ख नसेल, तर मिठाईचा थाट काहीसा अपूर्ण वाटतो. काजू कतली, पेढा, बर्फी, मोतीचूर यांसारख्या अनेक पारंपरिक गोड पदार्थांवर लावलेला हा चांदीचा अत्यंत पातळ थर मिठाईला एक वेगळाच शाही आणि प्रीमियम लूक देतो. पण, तुमच्या मनात कधी हा विचार आला आहे का, की मिठाईवर चांदीचा वर्ख नक्की का लावला जातो? हा केवळ सुंदरतेचा भाग आहे की यामागे काही जुनी परंपरा आहे?
भारतात चांदीचा वर्ख वापरण्याचा इतिहास अतिशय रंजक आहे. प्राचीन काळी राजघराण्यांमध्ये आणि शाही मेजवान्यांमध्ये अन्नपदार्थ अधिक खास आणि मौल्यवान दाखवण्यासाठी सोने आणि चांदीचा वापर केला जात असे. काळाच्या ओघात ही शाही परंपरा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली आणि मिठाईवर चांदीचा वर्ख लावणे हे शुभ, समृद्धी आणि पाहुण्यांच्या आदरातिथ्याचे प्रतीक मानले जाऊ लागले. चांदीचा वर्ख मिठाईला अधिक आकर्षक बनवण्याचे काम करतो. दिवाळी, लग्नकार्य किंवा कोणत्याही खास प्रसंगी लोक अशा मिठाईला अधिक पसंती देतात जी दिसायला अत्यंत भव्य आणि सुंदर वाटेल. यामुळेच आजच्या काळातही प्रीमियम मिठाईवर चांदीचा वर्ख आवर्जून वापरला जातो.
आयुर्वेदात चांदी या धातूला ‘थंड प्रकृती’ असलेला मानले गेले आहे. अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये चांदीच्या मर्यादित वापराचे शरीराला होणारे फायदे सांगण्यात आले आहेत. मर्यादित आणि योग्य प्रमाणात वापरलेला शुद्ध चांदीचा वर्ख शरीराला अंतर्गत थंडावा देण्यास मदत करतो, असे मानले जात होते. मात्र, आधुनिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते, केवळ ‘फूड ग्रेड’ प्रमाणित असलेल्या शुद्ध चांदीच्या वर्खचाच आहारात वापर केला पाहिजे. शुद्ध चांदीला अत्यंत बारीक आणि पातळ थरामध्ये तोडून किंवा विशिष्ट पद्धतीने कापून हा वर्क तयार केला जातो. हा थर इतका हलका आणि नाजूक असतो की हाताचा स्पर्श होताच तो तुटू शकतो. याच कारणामुळे अत्यंत काळजीपूर्वक कागदाच्या सहाय्याने तो मिठाईवर चिकटवला जातो.