नवी दिल्ली : 'मैने प्यार किया' मधील कबुतरामुळे अनेक लोक कबुतरांच्याही प्रेमातच पडले होते. अनेक लोक कबुतरे पाळतही असतात. पक्ष्यांवर प्रेम करावे, त्यांच्या हिताची काळजी घ्यावी; पण यामध्येही काही तारतम्य असावे. कबुतरे ही मानवासाठी घातकही ठरू शकतात याची जाणीव अनेकांना नसते. सध्या अनेक शहरांमध्ये कबुतरांनी उच्छादही मांडला आहे. विशेषतः दिल्ली-एनसीआरमध्ये राहणार्या लोकांसाठी ही एक समस्याच बनली आहे. कबुतरांपासून आपल्या फ्लॅटस्ना सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना हजारो रुपये खर्च करावे लागत आहेत. याचे कारण म्हणजे कबुतरांची विष्ठा अनेक कारणांमुळे धोकादायक ठरू शकते.
कबुतर अनेक प्रकारचे आजार फैलावू शकतात. त्यामध्ये 'हिस्टोप्लास्मोसिस'सारख्या आजाराचा समावेश आहे. कबुतरांच्या विष्ठेत 'एस्परगिलस फंगस' नावाचा बुरशीचा एक प्रकार आढळतो. तो मानवी आरोग्यासाठी धोकादायक असतो. कबुतरांची विष्ठा आम्लयुक्तही असते व त्यामुळे छत खराब होऊन लिकेजही होऊ शकते! लहान मुले, अस्थमाचे रुग्ण तसेच कमजोर रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या लोकांना कबुतरांच्या विष्ठेमुळे हिस्टोप्लास्मोसिस इन्फेक्शन होऊ शकते.
या संसर्गामुळे डोकेदुखी, ताप, कोरडा खोकला आणि सुस्तीसारखे फ्लुची लक्षणे दिसतात.'क्रिप्टोकॉकासिस फंगल इन्फेक्शन'चेही कबुतरे कारण बनू शकतात. त्यामध्ये फुफ्फुसे व चेतासंस्था कमजोर होते. हे सर्व विचारात घेता कबुतरांवर आपण जरूर प्रेम करावे; पण दुरूनच, इतका आपण धडा घ्यायचा!