बंगळूर : परीक्षा कोणतीही असो, प्रत्येक पालकासाठी, प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ती महत्त्वाची असते. त्यातही बोर्डाची परीक्षा असेल, तर त्याचे महत्त्व अर्थातच अनन्यसाधारण असते. विद्यार्थी हुशार असेल, सरासरी असेल किंवा कमकुवत. प्रत्येक जण परीक्षेच्या काळात सर्वोत्तम प्रयत्न करत असतो. आता परीक्षेत पूर्ण गुण मिळवणे अजिबात सोपे असत नाही. एका परीक्षेत मात्र जितक्या मार्कांचा पेपर होता, त्यापेक्षा अधिक गुण त्या विद्यार्थ्यांना मिळाले आणि तरीही त्यांना नापास ठरवले गेले आहे!
बंगळूरमधील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या विद्यार्थ्यांचा हा निकाल आहे. या इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांना एकूण गुणांपेक्षा अतिरिक्त गुण मिळाले. पण, आश्चर्य म्हणजे तरीही त्यांना नापास ठरवण्यात आले. अलीकडेच येथे 300 गुणांचा नर्सिंगचा पेपर झाला होता. त्यात अनेक विद्यार्थ्यांना यापेक्षाही जास्त म्हणजे अगदी 315 मार्क मिळाले. पण, तरीही त्यांच्या निकालपत्रावर नापास असा शेरा होता आणि यामुळे चौकशीला सुरुवात झाली.
त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार, नर्सिंगमध्ये एक अतिरिक्त विषय होता. त्याचे गुण अंतिम निकालात समाविष्ट होणार नव्हते; परंतु कॉपी तपासणार्या शिक्षकाने ते मार्कही जोडले, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या निकालात तफावत आढळून आली. अंतिम निकालात चुकीने अंतर्गत मूल्यांकनाचे काही गुण जोडण्यात आल्याने ही चूक झाल्याचे विद्यापीठाच्या मूल्यमापन विभागाकडून सांगण्यात आले. काही विद्यार्थ्यांना पूर्ण गुणांपेक्षा जास्त गुण पाहून धक्का बसला. ही अर्थातच आश्चर्यकारक बाब होती. संस्थेच्या अधिकार्यांनी पुन्हा नव्याने पुनर्मूल्यांकन केले आणि प्रत्यक्षात निकाल पुन्हा लागला व यावेळी गुण कमी झाल्याने अनेक विद्यार्थी नापास झाले.