

नवी दिल्ली : सध्या परीक्षांच्या 'टेन्शन'ने शालेय जीवनाचा आनंद हिरावून घेतला असल्याचेच दिसून येते. दहावी-बारावीच्या अनेक मुलांनी कमी गुणाच्या भीतीने उचललेली टोकाची पावले चिंता वाढवणारीच आहेत. परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर विद्यार्थ्यांना एकच भीती असते ती म्हणजे पालकांची. कमी गुण मिळाल्यावर पालक आता ओरडणार हे टेन्शन तर असतेच पण त्याचबरोबर उत्तरपत्रिकेवर व गुणपत्रिकेवर पालकांची सही घेणे हे एक वेगळेच टेन्शन असायचे. कमी गुण मिळाल्यानंतर पालकांची सही आणण्याचे विद्यार्थ्यांसमोर प्रेशर असायचे. अशातच सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये मुलीला परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतरही तिच्या आईने दिलेली प्रतिक्रिया मोठ्या चर्चेत आहे. अनेक पालकांनी यातून काही शिकावे, अशा प्रतिक्रियाही येत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (टि्वटर)वर ही पोस्ट शेअर करण्यात आली. यात दोन फोटो देण्यात आले आहेत. ही पोस्ट शेअर करताना लिहिलेले कॅप्शनही लोकांना खूप आवडलं आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मला इयत्ता सहावीतील जुनी वही सापडली. यावरून मला काही गोष्टी आठवल्या. शाळेच्या दिवसात गणितात कमी गुण असतानाही माझ्या आईने मला ओरडण्याऐवजी प्रत्येक कमी गुण असलेल्या उत्तरपत्रिकेत पॉझिटिव्ह व प्रेरणादायी मेसेज लिहित होती. शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये जो पहिला फोटो आहे त्यात ही महिला इयत्ता सहावीत असताना तिला गणितात 15 पैकी 0 गुण मिळाले होते.
त्यावर शिक्षकांनी गुण दिलेल्या उत्तरपत्रिकेवर तिच्या आईने सही करण्याव्यतिरिक्त एक संदेश लिहला आहे. 'असा रिझल्ट आणण्यासाठी हिंममत हवी', असे तिने लिहिले होते. तर, दुसर्या फोटोतही असाच पॉझिटिव्ह मॅसेज देण्यात आला आहे.दरम्यान, कमी गुण मिळाल्यानंतर किंवा नापास झाल्यानंतर पालकांकडून मुलांना रट्टे पडतात. काही ठिकाणी तर पालकांकडून दुसर्या मुलांसोबतही तुलना केली जाते. त्यामुळं मुलांच्या मनात एक प्रकारची भीती व नकारात्मकता निर्माण होते. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही मुलांना समजवून सांगितले किंवा घरात सकारात्मक वातावरण निर्माण केले तर मुलांना पुढे शिकण्यास व पुढे जाण्याचा मनापासून प्रयत्न करतील, असंदेखील काही जणांनी म्हटले आहे.