

नवी दिल्ली : काही लोक निसर्गाच्या नियमांना अपवाद बनतात आणि जगाचे लक्ष वेधून घेतात. गुजरातमधील प्रल्हाद जानी या साधुपुरुषाने 70 वर्षे अन्न-पाणी घेतले नव्हते. ते मल-मूत्र विसर्जनही करीत नसत, तरीही ते एक सक्रिय दीर्घायुष्य जगले. परमहंस योगानंद यांच्या आत्मचरित्रातही गिरिबाला नावाच्या अशाच एका योगिनीचा उल्लेख आहे.
सध्याही अशा अनेक व्यक्तींची चर्चा होते ज्या जुजबी आहारावर जिवंत आहेत. आपल्या देशातील अशीच एक महिला केवळ चहा पिऊन अनेक वर्षे जिवंत राहिलेली आहे. आता पाश्चात्त्य देशातीलही एका व्यक्तीने हैराण करणारा दावा केलाय. तो म्हणतो की, मला भूक लागत नाही. 17 वर्षांपासून तो फक्त कोल्ड्रिंग्स पितो. त्याने 2006 ला अन्न खाणं बंद केलं. एवढंच नाही तर तो म्हणतो मी फक्त चार तास झोप घेतो.
या व्यक्तीचं नाव घोलमरेजा अर्देशिरी असं आहे. अर्देशिरी यांनी असा दावा केला की, गेल्या 17 वर्षांपासून त्याच्या तोंडात अन्नाचा कण नाही. ते संपूर्ण दिवस फक्त शीतपेय पिऊन जगतात. कोल्ड्रिंग्स पिऊन तो फक्त जिवंतच नाही, तर पूर्णपणे तंदुरुस्त आहे. अर्देशिरी यांनी हेही सांगितलं की, त्याने या परिस्थितीची डॉक्टरांना जाणीव करून दिली. परंतु, कोणताही आजार झाल्याचं सांगण्यात आलं नाही. जेव्हा तो जेवण करतो तेव्हा त्याला तोंडात केस गेल्यासारखे वाटतात.
परंतु, कोल्ड्रिंग्ससोबत अशी कोणतीही समस्या येत नाही. डॉक्टरांनी अर्देशिरीला सांगितलं की, त्यांनी मानसोपचार करून घेणे योग्य ठरेल. परंतु, अद्याप अर्देशिरीला भुकेच्या बदलाचे कारण समजू शकले नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वजन वाढवण्यास आणि शुगर वाढवण्यास कोल्ड्रिंग्स मोठी भूमिका बजावतो. त्यामुळे खूप कमी प्रमाणात कोल्ड्रिंग्सचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, याचा अर्देशिरी यांच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही.