

नवी दिल्ली : आजच्या प्रचंड महागाईच्या काळात जिथे साध्या चहासाठीही १० ते १५ रुपये मोजावे लागतात, तिथे अवघ्या १ रुपयात भरपेट नाश्ता मिळणे ही कल्पनेच्या पलीकडची गोष्ट वाटते. मात्र, हे सत्य करून दाखवले आहे ‘राम बाबू अण्णा’ यांनी. गेल्या २५ वर्षांपासून ते कोणत्याही नफ्याची अपेक्षा न ठेवता अत्यंत अल्पदरात लोकांना स्वादिष्ट आणि पौष्टिक नाश्ता देण्याचे काम करत आहेत. सोशल मीडियावर सध्या अण्णांची ही प्रेरणादायी गोष्ट तुफान व्हायरल होत असून, लोक त्यांना ‘खरे हिरो’ म्हणून संबोधत आहेत.
अशी झाली उपक्रमाची सुरुवात
२५ वर्षांपूर्वी राम बाबू अण्णांची स्वतःची आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यावेळी त्यांनी पाहिले की, परिसरातील रोजंदारी मजूर, रिक्षाचालक, छोटे विक्रेते आणि गरीब विद्यार्थी पैशांअभावी सकाळी उपाशीपोटीच कामावर किंवा शाळेत जातात. ही परिस्थिती पाहून कोणीही उपाशी राहू नये या उद्देशाने त्यांनी १ रुपयात नाश्ता देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला अनेक लोकांनी त्यांना वेडे ठरवले. मात्र, सर्व अडथळ्यांवर मात करत त्यांनी घरच्या घरी इडली, उपमा आणि पोह्यासारखा ताजा नाश्ता १ रुपयात देण्यास सुरुवात केली. आज २५ वर्षे उलटूनही अण्णांनी नाश्त्याची किंमत १ रुपयाच ठेवली आहे.