तुम्ही नोकरी कधी सोडणार हेसुद्धा ‘एआय’ सांगणार! | पुढारी

तुम्ही नोकरी कधी सोडणार हेसुद्धा ‘एआय’ सांगणार!

टोकियो : सध्याचा जमाना हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा ‘एआय’चा म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. ‘एआय’चा आता कुठे व कसा वापर होईल, हे सांगता येणे कठीण झाले आहे व त्याबाबत माणसाचीच बुद्धी चकित होत आहे! ‘एआय’सह लोकांच्या कामाची पद्धत अधिक साधी, सोपी व्हावी हा ‘एआय’चा उद्देश आहे; पण, याचा दुरुपयोगही तितकाच सर्रास सुरू आहे. तर आता यादरम्यान आणखीन एक माहिती समोर येत आहे की, तुम्ही कधी नोकरी सोडणार हेसुद्धा आता ‘एआय’ तुमच्या बॉसला सांगणार…

जपानी संशोधकांनी एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल तयार केले आहे. या टूलसह कंपनीतील एखादा कर्मचारी किती दिवस ही नोकरी करणार आणि कधी ही नोकरी सोडणार, हे ‘एआय’ आधीच तुमच्या बॉसला कळविणार आहे. हे नवीन टूल तयार करण्यासाठी टोकियो सिटी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक नरुहिको शिराटोरी यांनी एका जपानी भांडवलावर आधारित स्टार्टअपबरोबर हातमिळवणी केली आहे. कर्मचार्‍यांना नोकरी सोडण्यापासून थांबविणे हा या टूलचा उद्देश असणार आहे.

‘एआय’ टूल कंपनीतील कर्मचार्‍यांचा डेटा, त्यांच्या उपस्थितीच्या नोंदीपासून ते वय, लिंग यासारख्या वैयक्तिक माहितीपर्यंतचा डेटा गोळा करील. हे टूल प्रत्येक फर्मचे टर्नओव्हर मॉडेल तयार करण्यासाठी कर्मचार्‍यांचा सुट्टीचा पॅटर्न, कंपनी सोडलेल्या कर्मचार्‍यांच्या डेटाचा अभ्यास करून एक अहवाल तयार करील. त्यानंतर ‘एआय’ टक्केवारी गुणांमध्ये कोण नोकरी सोडून जाईल याचा अंदाज लावेल. त्यामुळे मॅनेजरला कोण नोकरी सोडणार आहे, हे समजेल आणि तो त्या कर्मचार्‍यास कदाचित थांबवून, त्याची समजूत काढू शकेल, असे टोकियो सिटी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक नरुहिको शिराटोरी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

सध्या अनेक कंपन्यांसाठी या ‘एआय’ टूलची चाचणी केली जाते आहे आणि प्रत्येकासाठी एक मॉडेल तयार केले जात आहे. हे साधन तयार करण्यासाठी संशोधकांनी एआय वापर करून, मागील अभ्यासावर आधारित विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणवैशिष्ट्यांचा अंदाज लावला. त्यामुळे आता ते अपग्रेडची योजना आखत आहेत. त्यानुसार ‘एआय’ टूल नवीन कर्मचार्‍यांनी नोकरीच्या वेळी दिलेल्या मुलाखतींमधील माहिती आणि वैयक्तिक डेटा यांचे विश्लेषण करून, त्यांना नोकरीसाठी योग्य असाईनमेंट सुचवू शकेल. जपानी व्यावसायिकांच्या निरीक्षणातून असे समोर आले की, प्रत्येक वर्षी अनेक पदवीधरांना कामावर घेतले जाते; पण महाविद्यालयांत नवीन भरती झालेल्या 10 टक्क्यांपैकी एकाने वर्षभरात नोकरी सोडली आणि कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सुमारे 30 टक्के लोक तीन वर्षांत त्यांची कंपनी सोडतात, अशी माहिती सरकारी डेटामधून दिसून येत आहे. तर ही बाब लक्षात घेता, कर्मचार्‍यांनी नोकरी सोडू नये म्हणून बहुतांश वेळा ‘एआय’ टूलची मदत घेतली जाणार आहे.

Back to top button