चोवीस तासांपेक्षा जास्त शिळा भात का खाऊ नये? | पुढारी

चोवीस तासांपेक्षा जास्त शिळा भात का खाऊ नये?

नवी दिल्ली : जगभरातील असंख्य लोकांच्या रोजच्या आहारात भात असतो. भाताचे सेवन आरोग्यासाठीही अनेक लाभ देत असते. मात्र, जास्त शिळा भात खाऊ नये, असा सल्ला दिला जातो, त्याचाही विचार होणे गरजेचे आहे. शिजवलेला भात चोवीस तासांपेक्षा अधिक ठेवणे आणि खाणे हे हानिकारक ठरू शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

शिजवलेला भात पुन्हा गरम करण्यापूर्वी केवळ एक दिवस फ्रिजमध्ये ठेवला तरी चालतो. मात्र, जास्त शिळा भात खाल्ल्याने फूड पॉईझनिंग म्हणजेच अन्नातून विषबाधा होऊ शकते. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या माहितीनुसार, न शिजवलेल्या तांदळात सहसा बेसिलस सेरियस नावाच्या जीवाणूचे ‘स्पोरेस’ म्हणजेच सुप्त रूपातील कण असतात. जर शिजवलेला भात रूम टेम्परेचरमध्ये म्हणजेच सामान्य तापमानात अधिक काळ ठेवला, तर हे बीजाणू जीवाणूंमध्ये रूपांतरित होऊ शकतात.

शिजवलेला भात फ्रिजमध्ये जरी दीर्घकाळ ठेवल, तरी त्यावर बुरशी येऊ शकते. हे जीवाणू वेगाने वाढतात आणि विषारी घटक निर्माण करतात. तेच विषबाधेसाठी कारणीभूत ठरतात. कॉर्नेल युनिव्हर्सिटीतील फूड सायन्सचे प्राध्यापक डॉ. रॉबर्ट ग्रेवानी यांच्या माहितीनुसार, ‘फ्राईड राईस सिंड्रोम’ हा आजारही बेसिलस सेरियस जीवाणूमुळेच होतो. ते सफेद आणि ब्राऊन राईस अशा दोन्हीमध्ये आढळतात. कोरड्या किंवा शिजवलेल्या भातावर काळसर, हिरवट किंवा सफेद पावडरीसारखा जो पदार्थ तयार होतो तो खरे तर बुरशीच असतो. भातावर तयार होणारी बुरशी सहसा ‘एस्परगिलस ऑरिजी’ नावाची असते. त्याच्यापासूनही विषबाधा होते.

Back to top button