रक्ताच्या चाचणीतून घडणार नवी क्रांती
न्यूयॉर्क : रस्ते अपघातापासून गुन्हेगार पकडण्यापर्यंत व अगदी न्यायालयात साक्ष देण्यासाठीही उपयुक्त ठरेल, अशी नवी रक्त चाचणी संशोधकांनी शोधून काढली आहे. साक्ष म्हणून देता येईल, इथवर या चाचणीचा अहवाल खात्रीलायक असेल, असा या संशोधकांचा दावा आहे. एखाद्या व्यक्तीने मागील 24 तासांपासून झोप घेतलेली नसेल, तर ते या रक्त तपासणीतून स्पष्ट होईल आणि त्या आधारे खूप काही सिद्ध करता येईल, असे संशोधकांनी याप्रसंगी म्हटले आहे.
या चाचणीत संशोधकांनी अशा बायोमार्करचा उपयोग केला आहे, ज्यामुळे त्या व्यक्तीने मागील 24 तासांत झोप घेतली असेल की नाही, हे स्पष्ट होते. या चाचणीच्या माध्यमातून अतिशय बिनचूक चित्र स्पष्ट होईल, असा या संशोधकांचा दावा आहे. या अहवालातील निकाल 99.2 टक्के इतके अचूक असतात, असे ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठ, युके विद्यापीठ व बर्मिंगहम येथील संशोधकांना आढळून आले असल्याचे यावेळी नमूद केले गेले.
या चाचणीमुळे कमी झोप घेतलेले असताना किंवा अजिबातच झोप घेतलेले नसताना होणार्या रस्ते अपघातांचे प्रमाण 20 टक्यांनी कमी होऊ शकते, असा दावा केला गेला आहे. या चाचणीच्या माध्यमातून झोप पूर्ण झालेली नसेल, तर स्पष्ट होऊ शकते. इतकेच नव्हे, तर या चाचणीचा अहवाल न्यायालयात साक्ष म्हणून महत्त्वाचा ठरू शकतो, त्याचप्रमाणे गुन्हेगार पकडण्यातही महत्त्वाचा दुवा ठरू शकतो, असे संकेत आहेत.