सूर्यामुळे होणार पृथ्वीचा अंत; एकही सजीव जिवंत राहणार नाही, संशोधकांचा दावा | पुढारी

सूर्यामुळे होणार पृथ्वीचा अंत; एकही सजीव जिवंत राहणार नाही, संशोधकांचा दावा

वॉशिंग्टन : या नाम-रूपाच्या सर्व सृष्टीचा एक ना एक दिवस अंत ठरलेलाच आहे. जो जन्माला आला तो एक दिवस जाणार हे नक्की. अगदी अब्जावधी वर्षांचे आयुष्य असलेल्या ग्रह-तार्‍यांनाही हा नियम लागू आहे. एक दिवस पृथ्वीचाही अंत होऊन जगाचा विनाश होणार आहे. पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होईल यावर संशोधक संशोधन करत आहेत. याबाबत अनेक दावे केले जात आहेत. मात्र, नवीन संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 450 कोटी वर्षांनंतर सूयामुळे पृथ्वीचा अंत होणार आहे. तत्पूर्वीच 130 कोटी वर्षांनंतर पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहणार नाही, असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.

सूर्याच्या उत्क्रांतीमुळे आपली सौरमाला निर्माण झाली. सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि ऊर्जेमुळे सूर्यमालेतील सर्व ग्रह त्याच्याभोवती लयबद्ध पद्धतीने फिरत आहेत. पण, आपल्या सूर्यमालेत जीवसृष्टी फक्त पृथ्वीवरच आहे. 450 कोटी वर्षांनंतर पृथ्वीचा अंत होईल. सूर्यावरील हायड्रोजन आणि न्यूक्लियर फ्यूजन संपेल.

त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या दबावाखाली सूर्यामधील हेलियम कोअर लहान होईल. परिणामी तापमानात अधिकाधिक वाढ होत राहील. या उष्णतेमुळे सूर्याच्या बाहेरील प्लाज्मा थर संपुष्टात येईल. सूर्य गुरुत्वाकर्षण शक्तीने सूर्यमालेतील ग्रह खेचून घेईल. याच शक्तीने सूर्य पृथ्वीला देखील गिळंकृत करेल. सूर्याने पृथ्वीला गिळंकृत करण्याआधीच पृथ्वीवरील जीवसृष्टीचा अंत होईल. 130 कोटी वर्षांनंतर एकही सजीव जिवंत राहणार नाही.

पृथ्वीच्या तापमानात भयानक वाढ होईल. पृथ्वीवरील एकही सजीव उष्णता आणि आर्द्रता सहन करू शकणार नाही. पृथ्वीवरील सर्व महासागरांची वाफ होईल. सूर्याचा प्रकाश सध्याच्या तुलनेत 20 टक्क्यापेक्षा अधिक प्रखर असेल. हा सूर्य प्रकाश डोळ्यांना सहन होणार नाही. मनुष्यच नाही तर पृथ्वीतलावर अस्तित्वात असलेले लाखो जीव मरून जातील असे वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉक्टरेट संशोधक रॉडॉल्फो गार्सिया यांनी म्हंटले आहे. पृथ्वीवर विनाशकारी नैसर्गिक घटना घडतील. सूर्यात होणार्‍या बदलामुळे हे सर्व घडेल, असा दावा संशोधकांचा आहे.

Back to top button