![NASA](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F08%2F11-4-4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
फ्लोरिडा : पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर 3,84,400 किलोमीटर. भारताच्या चांद्रयानाने याच चंद्राच्या तिसर्या कक्षेत प्रवेश केला असून, पुढील काही दिवसांत लँडर व रोव्हरला चंद्रावर स्थापित केल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरेल. याचबरोबर अमेरिका, रशिया, चीननंतर चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा केवळ चौथा देश ठरणार आहे. या मोहिमेत अशा भागाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला जाईल, जो आजवर रहस्यमयच राहिला आहे. एरवी चंद्र शास्त्रज्ञ, अंतराळप्रेमी, सर्वसामान्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आले आहेच. पण, त्याशिवाय दक्षिण ध्रुवाबद्दल सर्वात अधिक आकर्षण राहिले आहे.
दक्षिण ध्रुव अशा ठिकाणी आहे, जेथे काही भागात पूर्ण काळोख आहे; तर काही ठिकाणी सावली असते. जेथे कायम सावली असते तेथे बर्फ जमतात, असे म्हटले जाते. याशिवाय सूर्याचा प्रकाश आतील बर्याच भागापर्यंत पोहोचत नाही. अमेरिकन अंतराळ संस्था 'नासा'चा असा दावा आहे की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवातील काही भागात अब्जावधी वर्षांपासून सूयर्र्प्रकाश पोहोचूच शकलेला नाही. अशा जागांचे तापमान उणे 203 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी होऊ शकते.
याच कारणामुळे क्रेटर अतिशय थंड आहेत. अतिशय थंड हवामानामुळे वर्षानुवर्षे येथे काहीही बदल दिसून येत नाहीत, असेही निरीक्षण नोंदवले गेले आहे. मागील अनेक वर्षांत जगभरातील अनेक देशांनी दक्षिण ध्रुवावर काही मोहिमा राबविल्या आहेत. दक्षिणी ध्रुवाखाली एखादी भव्य वस्तू लपलेली असू शकते, जी चंद्राच्या गुरुत्वाकर्षण ताकदीला प्रभावित करू शकते, असाही कयास आहे.