जास्त पाणीदेखील आरोग्याला घातक | पुढारी

जास्त पाणीदेखील आरोग्याला घातक

नवी दिल्ली : कोणत्याही गोष्टीचा अतिरेक जीवनात विषासारखा बनतो. पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे यात शंकाच नाही. त्यामुळेच पाण्याला जीवन अशी उपमा देण्यात आली आहे. पाणी प्यायल्याने शरीरातील पाण्याचे संतुलन राखले जाते आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. मात्र, इतर गोष्टींप्रमाणेच पाण्याच्या अतिसेवनाचाही शरीरावर नकारात्मक परिणाम होतो. यासंदर्भात आहारतज्ज्ञ असे सांगतात की, आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने रक्ताचे प्रमाण वाढते आणि जास्त पाणी फिल्टर करण्यासाठी किडनीवर दबावही वाढतो. यामुळे हृदयावर अधिक भार पडू शकतो आणि पोटात जळजळ वाढू शकते.

जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट संतुलन बिघडू शकते आणि रक्तातील सोडियमची पातळी कमी होते, ज्यामुळे हायपोनेट्रेमिया नावाची स्थिती निर्माण होते. हायपोनेट्रेमियाच्या लक्षणांमध्ये मळमळ, डोकेदुखी, अशक्तपणा, चिडचिड, स्नायू पेटके इ. समस्या निर्माण होण्याची भीती असते. इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनने पिण्याच्या पाण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे स्थापित केली आहेत. निरोगी व्यक्तीने दररोज सुमारे 9 ते 13 कप पाणी प्यावे.

जास्त पाणी पिण्याचे 4 दुष्परिणाम

जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते. या स्थितीलाच हायपोनेट्रेमिया म्हणतात. हृदय आणि मूत्रपिंडाच्या समस्या असलेल्या लोकांना हायपोनेट्रेमियाचा धोका जास्त असतो.

स्नायूंमध्ये जळजळ

ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, जास्त पाणी प्यायल्याने रक्तातील सोडियम आणि इतर इलेक्ट्रोलाईटस् पातळ होतात. परिणामी, शरीरातील सोडियमची पातळी कमी होते. शरीरात सोडियमचे प्रमाण कमी असल्याने स्नायूंमध्ये वेदना होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

वारंवार लघवी होणे

जास्त पाणी प्यायल्याने लघवी जास्त होते. अतिरिक्त पाणी प्यायल्यावर किडनीला सतत काम करावे लागते. अभ्यासातून असे दिसले आहे की, वारंवार लघवीमुळे किडनीवर जास्त ताण पडतो.

अतिसार

ओव्हरहायड्रेशनमुळे हायपोक्लेमिया होतो किंवा शरीरातील पोटॅशियमची पातळी कमी होते. क्लीव्हलँड क्लिनिकच्या वेबसाईटवरील अहवालानुसार, हायपोक्लेमिया पचनतंत्रावर थेट परिणाम करते. त्यामुळे उलट्या, जुलाब अशा समस्या निर्माण होतात.

Back to top button