2,500 वर्षांपूर्वीच्या संस्कृत सूत्राचा उलगडा करण्यात यश | पुढारी

2,500 वर्षांपूर्वीच्या संस्कृत सूत्राचा उलगडा करण्यात यश

लंडन : संस्कृत ही अनेक भाषांची जननी आणि जगातील आद्य व्याकरण शुद्ध भाषा आहे. संस्कृत व्याकरणाबाबत शेकडो वर्षांपासून पाणिनीच्या ‘अष्टाध्यायी’चे महत्त्व अबाधित आहे. केंम्ब्रिज विद्यापीठात पीएच.डी. करणार्‍या डॉ. ऋ षी राजपोपट यांनी ‘अष्टाध्यायी’मधील व्याकरणासंदर्भातील एका नियमविषयक सूत्राची योग्य उकल करण्यात यश मिळवले आहे. इसवीसन पूर्व पाचव्या आणि सहाव्या शतकामध्ये लिहिलेल्या या संस्कृत भाषेतील भाषाग्रंथातील स्पष्टीकरणाबाबत डॉ. राजपोपट यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. पाणिनी यांनी जो विशिष्ट नियम घालून दिला होता, त्याचा योग्य वापर कसा करावा, हे त्यांनी दाखवून दिले आहे.

चार हजार सूत्रांचा समावेश असलेल्या ‘अष्टाध्यायी’ हा ग्रंथ संस्कृत भाषेमागील विज्ञान समजावून सांगतो. या ग्रंथामधील माहितीच्या आधारे एखादा शब्द कसा तयार करावा किंवा संस्कृतमधील वाक्य कसं तयार करावं याचं मार्गदर्शन केलं जातं. मात्र यामध्येही बरेचदा पाणिनीचे दोनहून अधिक नियम एकाचवेळी वापरले जायचे आणि त्यामधून संभ्रम निर्माण व्हायचा.हा गोंधळ टाळण्यासाठी पाणिनीने सध्याच्या भाषेत ‘मेटा रुल’ म्हणजेच ‘नियमांचा नियम’ लिहून ठेवला.

पारंपरिक पद्धतीमध्ये हा नियम पुढील प्रमाणे होता : “दोन समान दर्जाचे नियम वापरताना संभ्र निर्माण झाला तर जो नियम ‘अष्टाध्यायी’मध्ये नंतर लिहिण्यात आला आहे त्याला प्राधान्य क्रमाने वापरावं.” आपल्या पीएच.डी.च्या ‘इन पाणिनी वी ट्रस्ट’ नावाच्या थिसिसीमध्ये डॉ. राजपोपट यांनी हा ‘मेटा रुल’ कसा वापरणे योग्य ठरते हे दाखवून दिले आहे. ‘मेटा रुल’ कायमच चुकीच्या अर्थाने समजून घेण्यात आला, असंही डॉ. राजपोपट यांनी म्हटलं आहे. पाणिनीला नियम शब्दाच्या डावीकडे वापरावा की उजवीकडे वापरावा याबद्दल सांगायचं होतं. ‘

उजवीकडील शब्दानुसार नियम वापरावा, असा या ‘मेटा रुल’चा अर्थ असल्याचं डॉ. राजपोपट यांचं म्हणणं आहे. हा नियम वापरला तर ‘अष्टाध्यायी’ हे अगदी अचूक भाषा निर्माण करणारं ‘मशिन’ असल्याचं डॉ. राजपोपट यांच्या लक्षात आलं. नियम अशापद्धतीने वापरल्यास प्रत्येकवेळी यामधून अचूक संस्कृत शब्द आणि वाक्य निर्माण करतात येतात, असं डॉ. राजपोपट यांचं म्हणणं आहे. डॉ. राजपोपट यांनी लावलेला शोध हा क्रांतिकारी असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या नियमांचा वापर केल्याने कॉम्प्युटर्समध्ये पहिल्यांदाच पाणिनीचं व्याकरण फीड करता येणार आहे, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ‘अष्टाध्यायी’मधील लिनियर आणि अगदी थेट नियमांमुळे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) सिस्टीमसाठीही याचा वापर करता येईल, जसा तो सध्या चॅटजपीटी बोटमध्ये केला जातो.

Back to top button