

नवी दिल्ली : माणूस हा एक संवेदनशील माणूस आहे. वेगवेगळ्या भावभावना आणि त्यांच्या शरीरावर उमटणार्या प्रतिक्रिया हे मानवाचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. 'अंगावर काटा येणे' ही अशीच एक प्रतिक्रिया आहे. भीतीनेही अंगावर काटा येऊ शकतो आणि प्रेमाने, आश्चर्यानेही माणसाच्या अंगावर शहारे येऊ शकतात. अनेक जणांना अंगावर शहारे येण्याचा अनुभव शूरवीरांच्या गोष्टी, देशभक्तिपर गीत ऐकताना किंवा त्यासंबंधित सादरीकरण पाहतानाही येतो. ही प्रतिक्रिया नेमकी कशी होते याची अनेकांना कल्पना नसते.
भय, आनंद, दु:ख अशा भावना अचानक दाटून येतात, तेव्हा आपल्या शरीरामध्ये एक विशिष्ट हार्मोन तयार होत असते. या हार्मोनमुळे शरीरातील काही स्नायू सैल होतात. सैल झालेले स्नायू अचानक काही सेकंदांसाठी पुन्हा ताणले जातात. या प्रक्रियेमुळे आपल्या त्वचेवरील केस उभे राहतात आणि मनामध्ये एक वेगळीच भावना निर्माण होते. याला आपण 'अंगावर काटा येणे' असे म्हणतो. जर अचानकपणे आपल्या डोळ्यांसमोर एखादी व्यक्ती किंवा गोष्ट आल्यास तेव्हाही क्षणभरात अंगावर काटा आल्याचे लक्षात येते. ही स्थिती मानवाच्या संवदेनशीलतेशी संबंधित आहे.
भीती, आनंद यासारख्या गोष्टींमुळे अंगावर काटा येऊ शकतो. याव्यतिरिक्त थंड वातावरणामुळेही ही स्थिती निर्माण होऊ शकते. गार वार्याचा परिणाम शरीरावर होत असतो. तेव्हा शरीराचे तापमान नियंत्रणात राहावे यासाठी शरीराच्या आतमध्ये काही बदल होत असतात. या बदलांच्या प्रतिक्रिया म्हणून अंगावर काटा येऊ शकतो. याव्यतिरिक्त काही आजारांमुळेही अंगावर सतत शहारे येऊ शकतात. अशावेळी डॉक्टरांकडे जाऊन उपचार करवून घेणे आवश्यक असते.
जेव्हा आपल्या अंगावर काटा येतो, तेव्हा शरीरातील स्नायू ताणले जातात. अंगाचे मालिश केल्याने ताणलेले स्नायू पुन्हा एकदा सैल होऊ शकतात. याव्यतिरिक्त ध्यानधारणा, नियमित व्यायाम, योगा केल्याने 'गुजबम्प्स' येण्याचे प्रमाण कमी होते. या गोष्टींमुळे मन आणि शरीर शांत होण्यास मदत होते. अंगावर काटा येणे किंवा अंगावर शहारे येणे ही सामान्य बाब असते; पण जर असे वारंवार घडत असेल, तर डॉक्टरांकडे जाऊन यावर सल्ला घेणे योग्य ठरते.