नाशिक : पुस्तकवाचनभिशी उपक्रम – रामनवमी – हनुमान जयंतीनिमित्त…
पुस्तकवाचनभिशी उपक्रम – रामनवमी – हनुमान जयंतीनिमित्त…
प्रभु श्रीराम – आपल्या आयुष्यात जसे नातेवाईक आहेत. तसेच रामायणामध्ये सुध्दा प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे. जसे प्रभु श्रीराम महत्वाचे आहे. तसे भरत या पात्राचे देखील महत्व आहे. भरताचे दासत्व आहे. तर लक्ष्मणाचे सौदार्य आहे. 12 वर्ष वनवासात न झोपता पाठराखण केली. सिताच्या नसानसात रोमरोमात राम वास करतात. जेथे रावणाचे कपट तर तिथे बिभीषणाचे दासत्वभाग. हनुमानाची सख्य भक्ती सगुण भक्ती, निर्गुण भक्ती नाही. रामायणात प्रत्येकजण तात्विक प्रदेशात आहेत. आपआपल्या कार्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आहेत. रामायण महाकाव्य धर्मावर आहे. आपले वचन मोडायचे नाही हा धर्म आहे. एकच कथानायक सर्व नियमांना वळसा घालू शकणारा सूत्रधार तो म्हणजे कृष्ण आहे. सगळे नियम मोडीत काढूनही तो सर्व नियमांना धरुन असतो. राम असे आहेत की, नियम कितीही अप्रिय असला तरी त्याचे पालन करणे सक्तीचे आहे. असा हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. एकवाणी, एकवचनी आणि एकपत्नी असे श्रीराम आहेत. किती सख्खा असला तरी त्यासोबत अन्यायाने लढायचे आहे.
रामायणातील प्रत्येक व्यक्तीरेखा आदर्श वाटतात. यात अनेक मानवी गुणांचे अनेकोत्तम दाखले आहेत. यात भ्रातृप्रेम, त्याग, सेवाभाव, वात्सल्य, हनुमंताची स्वामीननष्ठा, असे अनेक वैशिष्टये आढळतात. वाल्मिकी रामायण किती पुरातन असले तरी ते आजच्या परीस्थितीतही लागू पडते.
रामायणातील खारीचा वाटा – सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी श्रीराम, लक्ष्मण, वानरराज सुग्रीव, महावीर हनुमान, जांबुवंतआणि सर्व वानरसेना निघाली होती. ते भारताच्या दक्षिण टोकाला पाेहाेचले. लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करणे आवश्यक होते. हनुमानासारखे आकाशात उडण्याची शक्ती सर्वांमध्ये नव्हती. त्यामुळे त्यांनी लंकेत जाण्यासाठी सेतु (पूल) बांधायचे ठरवले. सर्व वानरसेना मोठे मोठे दगड आणून त्यावर श्रीराम असे प्रभुचे नाव लिहून समुद्रात टाकत होते. ते प्रभुनामाच्या महिमेमुळे ते दगड समुद्रात तरंगत होते. हळूहळू सेतू आकार घेत होता. यावेळी एका छोट्या खारीला पण वाटले की आपणही सेतू बांधायला मदत करावी. मदत काय करणार म्हणून ती समुद्राच्या बाजूला असलेल्या वाळूत जाऊन लोळायची व आपल्या शरीरावरील केसात बारीक वाळू आणून ती सेतूवर टाकायची. इतर वानरांना जेव्हा खारुताईची मदत पाहिली तेव्हा ते हसायला लागले. ते तिला म्हणाले "अगं खारुताई, लंकेत जायला मोठा सेतू बांधायचा आहे. आम्ही बघ किती मोठे दगड उचलून आणतो आहे. तुझ्या अंगाला चिटकलेल्या वाळूमुळे सेतू बांधण्यास काय मदत होणार? तु उगाच धडपड करू नकोस." खार हिरमुसली. प्रभु श्रीरामांनी हा संवाद ऐकला. त्यांनी खारीला उचलुन हातावर घेतले. आणि इतर वानरांना म्हणाले. "चांगल्या कामात फक्त मोठे काम करणे महत्वाचे नसते. चांगल्या भावनेने आपल्याला जे योगदान शक्य असेल ते करणं महत्वाचं असतं. आपल्याकडे जास्त क्षमता असेल म्हणुन दुस-यांच्या छोट्या सत्कार्याला करण्यापासून रोखू नये. लहान, मोठे, कमजोर आणि शक्तीवान अशा सगळ्यांनी आपल्या परीने योगदान दिले तरच मोठं कार्य पूर्ण होणार आहे. अशावेळेस आपले कार्य आणि दुस-याच कार्य याची तुलना करू नये. तसे करुन आपण व आपल्या कार्याची किमत कमी होते. वानरांनी क्षमा मागितली आणि त्यांनी खारूताईच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. तिच्या शरीरावर काळे पट्टे उमटले. प्रभु श्रीरामाची ही निशाणी प्रत्येक खारुताईच्या शरीरावर दिसून येते.
गोष्टीतले तत्त्वज्ञान सारांश असे सांगते की कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. ते काम करणा-या व्यक्तीची भावना महत्वाची असते. म्हणून कोणालाही कामावरुन हिणवू नये. आपण कोणत्याही चांगल्या कार्यात विघ्न न आणता खारीचा वाटा देता आता तर नक्कीच द्यावा.
कोण होती देवी शांता? तुम्हाला वाटत असेल की रघुकूल वंशात राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न अशा चार मुलांचा जन्म झाला मात्र त्यापुर्वीही दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांच्या पोटी आधीच एका कन्येने जन्म घेतला होता. रघुवंश कुळातील ही सर्वात ज्येष्ठ कन्या होती. शांतेचा जन्म झाला आणि राणी कौसल्येच्या मांडीवर ती खेळू लागली. मात्र त्यानंतर पुढील तब्बल १२ वर्ष दशरथ राजाला मुलगा होत नव्हता. शांता लहान असतानाच दशरथ राजाकडे कौसल्या राणीची बहिण वर्षीणी आणि तिचे पतीदेव राजा रोमपद आले होते. दशरथ राजा आणि कौसल्या राणी यांनी त्यांचे आगतस्वागत केले. मात्र चर्चादरम्यान राणी वर्षीणी दुःखी असल्याचे कौसल्या राणीला कळले.विवाहानंतर अनेक वर्ष उलटली तरीही अपत्यप्राप्ती नसल्याने हे दाम्पत्य दुःखी असल्याचे कळताच राजा दशरथाने उदार मताने आपली लाडकी लेक शांता या दाम्पत्याला दत्तक म्हणून देण्याचे जाहीर केले. अर्थात शांता ही मावशीच्याच घरी राहणार असल्याने तिचे उत्तम प्रकारे संगोपन होईल याची कौसल्या राणीला खात्री होती. शिवाय या निर्णयाने आपली बहीण आनंदी राहील या विचारांनी राणी कौसल्येने राजाच्या निर्णयाला होकार दिला आणि तेव्हापासून लहानगी शांता रोमपद राजाच्या राजवाड्यात आनंदाने नांदू लागली. अंगद देशाच्या राजा रोमपद यांच्या राजवाड्यात लाडाने वाढणाऱ्या शांतेला वेदशास्त्र, धनुर्विद्या, कला अशा वेगवेगळ्या विषयांचे ज्ञानही अवगत असल्याचे आख्यायिका सांगतात.
म्हणून रामायणात फारसा उल्लेख नाही… रामायणाची कथा सुरु होते ती दशरथ राजा आणि त्याच्या तिन्ही राण्यांना अपत्यप्राप्ती होत नसल्याच्या चिंतेपासून! शांताच्या जन्मानंतर पुन्हा एकदा आपल्या घरात बाललिला दिसू लागतील या विचारांनी दशरथ राजा आणि राणी कौसल्या यांनी आपल्या लेकीला बहिणीला दत्तक दिले, मात्र त्यानंतर अनेक वर्ष त्यांना अपत्यप्राप्ती होत नव्हती. अशातच राणी कैकयी आणि सुमित्रा यांच्याही पदरी मुलबाळ नव्हते.राजा दशरथ यांनी श्रृंगी ऋषींच्या आदेशाप्रमाणे पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्याचेच फलित म्हणजे अयोध्येत चार बालकांचा जन्म झाला.

