औरंगाबाद : नाथसागर धरणाचे आपत्कालीन सात दरवाजे प्रथमच उघडले; नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा | पुढारी

औरंगाबाद : नाथसागर धरणाचे आपत्कालीन सात दरवाजे प्रथमच उघडले; नदीकाठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणाचे शुक्रवारी (दि.२) रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान आपत्कालीन सात दरवाजे उघडण्यात आले. यामुळे मोठा पाण्याचा विसर्ग सुरु झाला असून नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाथसागर धरणाचा १८ नंबर दरवाजा चार फुट, त्यासोबत आपत्कालीन २ ते ८ क्रमांकाचे सात दरवाजे अर्धा फूट खुले केल्याने यावर्षी प्रथमच गोदावरी नदीत ७९ हजार १२४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. दरम्यान, गुरुवारी व शुक्रवारी नाशिक परिसरातील धरणातून नाथसागर धरणामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी येत असल्यामुळे हे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

शुक्रवारी सायंकाळी तहसीलदार शंकर लाड यांनी महसूल पथकातील मंडळ अधिकारी गणेश सोनवणे, तलाठी आकाश गाडगे, बी. टी धारकर यांनी धरणात येणाऱ्या पाण्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांच्याकडून घेतली. यानंतर गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या आपेगाव, वडवळी, नवगाव, उंचेगाव, टाकळी अंबड, पाटेगाव, नायगाव, मायगाव या ठिकाणी पाहणी करून नदी काठावर असलेल्या शेतकरी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य पूर परिस्थितीमध्ये संबंधित ग्रामसेवक, तलाठी यांनी मुख्यालय सोडू नये अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. पाण्याचा विसर्ग वाढल्याने अनेक गावातील शेतकऱ्यांच्या गोदावरी नदीतील पाण्याच्या विद्युत मोटर काढून घेण्यासाठी तारांबळ उडाली होती.

हे वाचलंत का?

Back to top button