

पुणेः पुढारी वृत्तसेवा : व्यवसायातील गुंतवणुकीवर 20 टक्के आर्थिक मोबदला देण्याचे प्रलोभन दाखवून एका व्यावसायिकाची 19 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये महिला पोलिस कर्मचार्याचा समावेश आहे. शंकर लक्ष्मण गायकवाड (वय 54), ज्योती शंकर गायकवाड (वय 50, राहणार दोघेही रास्ता पेठ, शिराळ शेठ गल्ली) अशी दोघांची नावे आहेत. यातील ज्योती गायकवाड या पोलिस खात्यात नोकरीस असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी, सदाशिव राजाराम नलावडे (वय 52, रा. शांताई हॉटेलजवळ, रास्ता पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 28 मे ते 28 मार्च 2022 या कालावधीत घडला आहे.
फिर्यादी नलावडे यांचा चारचाकी गाड्या दुरुस्तीचा व्यवसाय आहे, तर आरोपी गायकवाड दाम्पत्याचा 'टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स'चा व्यवसाय आहे. आरोपी शंकर गायकवाड हे त्यांच्याकडे नेहमीच गाड्या दुरुस्तीसाठी येत होते. त्यातूनच त्यांचा परिचय झाला होता. तसेच, ज्योती या पोलिस खात्यात नोकरीस असून, कमिशनर ऑफिस येथे कार्यरत असल्याचे गायकवाड यांनी त्यांना सांगितले होते. 2019 मध्ये दोन्ही आरोपींनी नलावडे यांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगितले होते. त्यांनी गुंतवलेल्या पैशातून नवीन इन्होवा किंवा चारचाकी गाडी घेऊन व तुमच्या आर्थिक गुंतवणुकीपोटी अत्यंत कमी कालावधीत 20 टक्के आर्थिक मोबदला देऊ, असे सांगितले होते. आरोपींनी केलेल्या वारंवार विनंतीमुळे नलावडे यांनी मे 2021 पासून वेळोवेळी 11 लाख रुपये बँकेद्वारे, तर साडेआठ लाख रुपये रोखीने, असे फेब—ुवारी 2022 पर्यंत 19 लाख 50 हजार रुपये हवाली केले.
फेब—ुवारी 2022 मध्ये आरोपी शंकर गायकवाड हे नलावडे यांना टाळू लागला. नलावडे यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी गाड्या घेतल्याच नाहीत. त्यामुळे संशय आल्याने नलावडे हे गायकवाड दाम्पत्यांच्या घरी गेले. मुलाचे लग्न असल्याचे सांगून त्यांनी दोघांकडे पैशाची मागणी केली. नाहीतर मला पोलिसात जावे लागेल, असे सांगितले. त्या वेळी गायकवाड दाम्पत्याने नलावडे यांना सुरुवातीला काही धनादेश दिले व पोलिसात न जाण्याचे सांगितले. मात्र, ते धनादेश न वटता परत आले. त्यामुळे नलावडे यांनी गायकवाड यांना विचारले, तेव्हा त्यांनी मे 2022 पर्यंत सर्व पैसे देतो, असे सांगितले होते.
परत त्यांनी नलावडे यांना काही धनादेश दिले, परंतु तेदेखील वटले नाहीत. त्यामुळे त्यांनी 15 मे 2022 रोजी वकिलामार्फत नोटीस पाठवली. त्या वेळी गायकवाड दाम्पत्य घराला कुलूप लावून निघून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनीदेखील याबाबत खात्री केली असता, त्यांचे घर बंद असल्याचे समोर आले. त्यानंतर नलावडे यांनी न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानुसार गायकवाड दाम्पत्याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.