Chittah In India प्रतीक्षा संपली…अखेर नामिबियातील चित्त्यांचे भारतात आगमन! मोदी यांच्या हस्ते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात येईल….
पुढारी ऑनलाइन डेस्क : Chittah In India वन्यजीव प्रेमींची प्रतीक्षा संपली. भारतात नामशेष झालेल्या चित्त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारने महत्वाकांक्षी योजना हाती घेऊन नामिबियातून चित्ते मागवण्याचा निर्णय घेतला. आज अखेर या बहुप्रतिक्षीत चित्त्यांची प्रतीक्षा संपली. आज सकाळी विमानाने नामिबियातील 8 चित्ते दाखल झाले आहेत. विमानाने हे चित्ते भारतात दाखल झाले आहेत. ग्वाल्हेर येथे हे चित्ते पोहोचले.
Chittah In India एकूण आठ चित्ते नामिबियातून भारतात आणण्यात आले आहे. यामध्ये 5 मादी आणि तीन नर आहेत. या चित्त्यांना आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो पालपूर राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांसाठी खास बांधलेल्या निवाऱ्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. चित्त्यांना भारतात पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने खास चित्ता री-इंट्रोडक्शन प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पा अंतर्गत मोठी प्रक्रिया पूर्ण करून अखेर हे चित्ते भारतात दाखल झाले आहेत. त्यामुळे वन्यजीव प्रेमींना आता कुनो राष्ट्रीय उद्यानात हे चित्ते पाहण्याची संधी मिळणार आहे.
…असा झाला होता भारतातून चित्ता नामशेष!
Chittah In India भारतातून 1955 च्या आसपास चित्ता नामशेष झाला होता. 1951 मध्ये आंध्रप्रदेशातील जंगलात शेवटचा जंगली चित्ता दिसल्याची नोंद आहे. एकेकाळी चित्ता हा अफ़्रिका युरेशिया व भारतीय उपखंडातील मोठ्या भूभागावर पसरला होता, . भारतातील चित्त्याला अशियाई चित्ता म्हणत. त्याचा भारतात एके काळी मोठ्या भूभागावर वावर होता. परंतु आज केवळ अफ़्रिकेच्या गवताळ प्रदेशापुरते चित्त्याचे स्थान मर्यादित राहिले आहे. याला मुख्य कारण चित्याचे नष्ट झालेले वसतिस्थान हे आहे. चित्त्याचे मुख्य वसतिस्थान जे गवताळ प्रदेश आहे. त्यावर शेती व इतर कारणासाठी मानवी अतिक्रमण झाले. तसेच चित्त्याचे वैशिष्ट्य जे अतिवेग आहे तो चित्त्याच्या प्रगतीत खरेतर मारक ठरला.
नामिबीयातून भारतात होत असलेले चित्त्यांचे आगमन ही येथील जैवविवधतेला हरवलेले गतवैभव मिळवून देण्याची संधी असून तिचे सोने करण्यासाठी सरकारने दीर्घकालीन चित्ता संवर्धन नियोजन करणे अनिवार्य आहे. माळरान हाच या जीवांचा खरा अधिवास असल्याने या पार्श्वभूमीवर देशातील महसुली माळरानांचे पुनरुज्जीवन करावे, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय वन्यजीव अभ्यासक केदार गोरे यांनी व्यक्त केली.
चित्त्यांना पुन्हा भारतात आणून रुजवण्याच्या या प्रकल्पाबद्दल नरेंद्र मोदी यांनी काल ट्विट केले. ते म्हणाले देशात वन्यजीवांच्या संरक्षणाच्या प्रयत्नांना एक नवीन बळ मिळेल. नामिबियातून आणण्यात येणारे चित्ते साधारण पणे 10.45 वाजता मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्याचा संधी मिळेल. असे ट्विट मोदीजींनी केले आहे.

