

कुडाळ; पुढारी वृत्त्तसेवा : आज आपला महाराष्ट्र कठीण परिस्थितीतून जात आहे, पण तुम्ही घाबरू नका, धोका देणार्यांना जनता कधीच माफ करणार नाही. सन २०२४ ची वाट पाहा, ३१ डिसेंबरला हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असा विश्वास ठाकरे गटाचे युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान पदवीधर मतदान संघाच्या निवडणुकीसाठीही शिवसैनिक पेटुन उठला आहे. त्या निवडणुकीतही आपला उमेदवार जिंकण्यासाठी सज्ज झाला असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या 'खळा बैठकी'च्या टप्प्याचा शुभारंभ सिंधुदुर्गात आजपासून (दि. २३) सुरू झाला. हा टप्पा दि. 9 डिसेंबर रोजी संपणार आहे. कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे येथे शिवसेना महिला संघटक स्नेहा दळवी यांच्या निवासस्थानी अंगणात ही खळा बैठक संपन्न झाली. यावेळी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, समन्वयक प्रदिप बोरकर, किशोर जैन, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, महिला जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, युवा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, नागेंद्र परब, संतोष शिरसाट, बबन बोभाटे, राजन नाईक,अतुल बंगे आदिसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, जसं आपण मातोश्रीवर येत असतात तसच आज मी आपल्या घरी आलो आहे. शिवसेना हा आपला परिवार आहे. आपल्या या राजकीय वाटचालीत चांगले वाईट व आनंदाच्या गोष्टी घडत असतात. यातुनच आपण शिकत असतो. यातुन काय शिकायच, कस लढायचं हे हिंदुहृदयसंम्राट बाळासाहेब ठाकरे व उध्दव ठाकरे यांना पाहुन समोर कितीही वादळं आली तरी कस लढायच? समोर कोणाचे सैनिक आहेत? शत्रु किती मोठा असला तरी ते राजकीय शत्रु कसे आहेत? कोण आहेत? आपली तलवार कशी वापरायची? हे आपण शिकत असतो. हे पाहुनच आपण काम करा, म्हणजे आपला विजय पक्का होईल असे प्रतिपादन ठाकरेंनी केले.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, आता पदवीधर मतदार संघाची निवडणुक होवू घातली आहे. गेली अनेक वर्ष आपण पदवीधर मतदार संघ जिंकत आलो आहोत. यावेळी आपण जिंकणार तशी तयारी सुरू आहे. कोकण पदवीधर मतदार संघ मागच्या वेळी लढलो, पण थोडक्यात ही जागा गेली पण यावेळी ही जागा जिंकण्यासाठी शिवसैनिक पेटुन उठला आहे. या मतदार संघात चांगली नोंदणी झाली आहे. तरी ती नोंदणी अधिकाधिक करा असे आवाहन केले.
आता शिवसेनेचे केवळ 16 आमदार आहेत तरीपण ते महाराष्ट्राचा विचार करत आहेत. यापुढे 16 चे 160 होतील तेव्हा देखील आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करत राहाणार आहोत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आपले काम आणि लढा थांबणार नाही, गेल्या दीड वर्षात खोके सरकारच्या काळात एकही उद्योग महाराष्ट्रात आला नाही. सगळे उद्योग गुजरातला गेले. नको असलेले उद्योग माथी मारण्याचे काम सुरू आहे. आपली वानखेडे हक्काची फायनल सुध्दा गुजरातला गेली असल्याची खंत ठाकरे यांनी व्यक्त करत आपण महाराष्ट्रासाठी येथील जनतेसाठी लढा देत आहोत असे सांगितले.
यावेळी खा. विनायक राऊत, यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौर्याचा उद्देश स्पष्ट करत कोकण पदवीधर मतदार संघात चांगली नोंदणी झाली असल्याचे सांगुन आदित्य ठाकरे आपल्या परिवाराच्या सदस्यांच्या गाठी भेटी घेण्यासाठी आले असल्याचे सांगितले. आ. वैभव नाईक यांनी कोकण पदविधर मतदार संघात आपला उमेदवार मोठ्या संख्येने निवडुन देवू अशी ग्वाही दिली.खळा भेटीच्या दरम्यान महिला संघटक स्नेहा दळवी यांनी कोकणची खासीयत असलेल्या उकडीचे मोदक, पातोळे,कणगी,करांदे आदिचा आदित्य ठाकरे यांनी मनमुराद आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बबन बोभाटे यांनी केले.
हेही वाचा