

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून रविवारी राज्यातील नागरिक हैराण झाले. अंगाची लाही लाही करणारा उष्मा राज्यात सर्वत्र होता. परभणी व अकोला या शहरांचे तापमान 44 अंशांवर गेले होते. दरम्यान, बंगालच्या उपसागरात मान्सूनची आगेकूच सुरू असून तेथे तुफान पावसाला सुरुवात झाली आहे.
बंगालच्या उपसागरात मान्सूनचे आगमन झाले असले तरीही महाराष्ट्रात त्याला येण्यास 8 ते 12 जून ही तारीख उजाडू शकते. त्यामुळे हा उकाडा अजून किमान वीस दिवस सहन करावा लागणार आहे. राज्यात रविवारी सर्वत्र उष्ण लहरींनी हाहाकार माजवला. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह कोकणात प्रचंड उकाड्याने नागरिक हैराण झालेले दिसत होते. विदर्भात सरासरी कमाल तापमान 43, मराठवाड्यात 42, कोकणात 36, मध्य महाराष्ट्रात 42 अंशांवर गेला होता. प्रचंड उष्मा आणि वाढलेली आर्द्रता यामुळे कोकणसह आंध्र, तामिळनाडू किनारपट्ट्यांना पुन्हा 'हीट डिस्कम्फर्ट'चा इशारा देण्यात आला आहे.