औरंगाबाद; वृत्तसंस्था : येथील वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित निमंत्रित जिल्हा राज्यस्तरीय कुमार/कुमारी गट कबड्डी स्पर्धेत ठाणे, पालघर, सांगली, औरंगाबाद, नांदेड, पुणे, मुंबई उपनगर यांनी निमंत्रित जिल्हा राज्यस्तरीय कुमारी गट कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली.
या स्पर्धेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. यात कुमारी 'अ' गटात पालघरने रत्नागिरीला 45-25 असे नमवत साखळीत पहिल्या विजयाची नोंद केली. भूमी मोरे, अनिता काटकर यांच्या चौफेर खेळाच्या बळावर पालघरने पहिल्या डावातच 30-09 अशी भक्कम आघाडी घेत विजयाचा पाया रचला. दुसर्या डावात सावध खेळ करीत या विजयावर शिक्कामोर्तब केले. रत्नागिरीच्या पूजा गावित, जुईली चमकल्या.
याच गटात ठाण्याने देखील रत्नागिरीला 50-25 असे पराभूत केल्यामुळे साखळीतच त्यांना गारद व्हावे लागले. देवयानी पाटील, पूजा इंगवले यांच्या चतुरस्त्र खेळामुळेच ठाण्याने ही किमया साधली. रत्नागिरीच्या सानिका भाटकर, वैष्णवी जाधव यांचे प्रयत्न अपुरे ठरले. याच गटातील शेवटचा सामना ठाणे विरुद्ध पालघर असा झाला. तो 25-25 असा बरोबरीत सुटला. 'ड' गटात नांदेडने बलाढ्य पुणेवर 27-21 असा पराभव करीत या स्पर्धेत खळबळ उडवून दिली. सानिका पाटील, अमृता दिवासे, अपर्णा पोवार या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. अनुष्का फुगे, साक्षी गावडे यांनी पुण्याकडून कडवी लढत दिली. याच गटात पुण्याने रायगडला 36-12 असे नमवत बाद फेरीतील आपली जागा निश्चित केली. याच गटातील शेवटच्या साखळी सामन्यात नांदेडने रायगडला 25-16 असा पराभव करीत या गटात प्रथम क्रमांक मिळवत बाद फेरी गाठली.