पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर भारताचा प्रशिक्षक बनणार आहे. गंभीरला टीम इंडियाचा नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत घोषणेपूर्वी गौतम गंभीर यांनी शुक्रवारी कोलकाता येथे कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) निरोप घेतला. यावरून गौतम गंभीरच टीम इंडियाचा हेड कोच बनणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे, असे वृत्त 'NDTV'ने दिले आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे दिसत आहे. राहुल द्रविडने संघात राहण्याचा निर्णय न घेतल्याने गंभीरचे नाव सर्वोच्च पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
भारतीय महिला संघाचे माजी प्रशिक्षक वुर्केरी व्यंकट रमन यांच्याशी गंभीरची स्पर्धा असली तरी, त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) क्रिकेट सल्लागार समिती (CAC) लाही त्यांच्या सादरीकरणाने प्रभावित केले असले तरी, गंभीरलाच या भूमिकेसाठी पसंती मिळेल, असे देखील एका अहवालात म्हटले आहे. ईडन गार्डन्सवर झालेल्या 'फेअरवेल शूट'ने गंभीरने केकेआरला निरोप देत, तोच टीम इंडियाचा पुढील मुख्य प्रशिक्षक असेल हे चित्र स्पष्ट केले आहे.
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालच्या (CAB) अधिकाऱ्याने पुष्टी केली आहे की, गंभीर शुक्रवारी 'फेअरवेल शूट'साठी स्टेडियममध्ये उपस्थित होता. "हे अत्यंत कमी लोकांना माहिती होते. त्यांनी ईडनवर एक व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ चाहत्यांना निरोप देण्यासाठी होता. हा व्हिडिओ कोलकाता नाइट रायडर्सने (आयपीएल) नाही तर गौतम गंभीरच्या वैयक्तिक संघाने शूट केला होता. टीम इंडियाचे नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरच्या नियुक्तीनंतर हा व्हिडिओ प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे, असेही संबंधित अधिकाऱ्याने माध्यमांना दिलेल्या माहितीत सांगितले आहे.