नवी दिल्ली : विराट कोहली गेली अनेक वर्षे भारतासाठी क्रिकेट खेळतोय; पण गेल्या काही वर्षांत विराट प्रत्येक बड्या स्पर्धेनंतर लंडनमध्ये सुट्टी घालवण्यासाठी जातो. अनेकदा त्याच्याबद्दल असेही बोलले जाते की, तो लंडनमध्ये कायमचा निघून जाणार आहे. याचबाबत आता महत्त्वाची माहिती मिळाली आहे. तो आपल्या कुटुंबासह भारत सोडून लवकरच लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी दुजोरा दिला आहे.
सध्या कोहली ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावसकर मालिका खेळत आहे. तिथे पत्नी अनुष्काही त्याच्यासोबत आहे. प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी एका मुलाखतीत सांगितले की, हो विराटच्या मनात तसा विचार आहे आणि ते लवकरच घडताना दिसेल.
राजकुमार शर्मा यांना विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दलही विचारण्यात आले. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीनंतर विराट निवृत्तीचा निर्णय घेणार का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर राजकुमार शर्मा म्हणाले की, असे अजिबात होणार नाही. विराट अजूनही तंदुरुस्त आहे. तो आणखी 5 वर्षे क्रिकेट खेळू शकतो. मी विराटला 10 वर्षांचा असल्यापासून ओळखतोय. त्याच्यात अजून बरेच क्रिकेट बाकी आहे. तो 2027 चा वन-डे वर्ल्डकप खेळेल.