

team india coach gambhir big statement on shubman gill's leadership
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी शुभमन गिलच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले आहे. गंभीर यांनी स्पष्ट केले की, ‘कर्णधार म्हणून गिलने इंग्लंडच्या आव्हानात्मक भूमीवर आपली सर्वात कठीण परीक्षा दिली नाही, तर ती यशस्वीपणे पार करून दाखवली आहे. गिलच्या नेतृत्वाने संघाला नवी ऊर्जा दिली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत २-० असा दणदणीत विजय मिळवत, भारतीय संघाने आपली ताकद सिद्ध केली.’
गंभीर यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘गिलला कसोटी तसेच एकदिवसीय (वनडे) अशा दोन्ही महत्त्वाच्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा सोपवून कुणीही उपकार केलेले नाहीत. गिलने आपल्या मेहनतीने आणि मैदानातील कामगिरीने हे स्थान मिळवले आहे. तो या सन्मानाचा खरा हक्कदार आहे,’ गंभीर यांच्या या वक्तव्यातून गिलच्या क्षमतेवर त्यांचा असलेला अढळ विश्वास दिसून येतो.
गिलच्या नेतृत्वाखाली भारताने नुकतीच इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली होती, तर आता वेस्ट इंडिजला दोन्ही सामन्यांमध्ये धूळ चारली.
'हिटमॅन' रोहित शर्माच्या जागी आता युवा तडफदार फलंदाज शुभमन गिलकडे एकदिवसीय (वनडे) संघाचे कर्णधार पद सोपवण्यात आले आहे. त्याच्या नव्या नेतृत्वाचा रोमहर्षक प्रवास ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या दौऱ्याने सुरू होणार आहे.
या ऐतिहासिक बदलावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना विचारण्यात आले की ते नव्या कर्णधाराला कसे हाताळतील? गंभीर यांचे उत्तर आत्मविश्वासपूर्ण होते. ते म्हणाले की, ‘गिलला आपला स्वाभाविक दृष्टिकोन कायम ठेवण्याची मुभा दिली आहे. त्याला कोणत्याही दबावाशिवाय, त्याच्या नैसर्गिक शैलीने निर्णय घेण्याची संधी दिली जाईल.’
गंभीर यांनी ठामपणे सांगितले की, ‘तो या स्थानास पूर्णपणे पात्र आहे. मला वाटते की त्याला कसोटी किंवा वनडे कर्णधार बनवून कुणीही त्याच्यावर कोणताही उपकार केलेले नाही. मला वाटते की तो या सन्मानास पात्र आहे. त्याने तो स्वकर्तृत्वाने कमावला आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘माझे मत आहे की त्याने कठोर परिश्रम घेतले आहे. कर्णधार म्हणून इंग्लंड दौराही त्याने आधीच सर्वात कठीण परीक्षा पार केली आहे. इंग्लंडचा दौरा खरोखरच खूप कठीण होता, कारण तिथे परदेशी परिस्थितीत एका मजबूत संघाशी आमचा सामना होता. गिलने पुढे होऊन नेतृत्व केले आणि खेळाडूंमध्ये स्वतःसाठी आदर कमावला.’
गंभीर सध्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करत आहेत आणि भारत २०२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा (WTC) अंतिम सामना खेळेल की नाही, याची त्यांना चिंता नाही.
गंभीर म्हणाले, ‘२०२७ मध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काय होईल हे मला माहिती नाही कारण मी इतक्या दूरचा विचार करत नाही. मला वर्तमानात राहायला आवडते. आमच्यासाठी प्रत्येक मालिकेत विजय नोंदवणे महत्त्वाचे आहे. आमचे वेळापत्रक खूप व्यस्त आहे आणि आशा आहे की पुढेही आम्ही अनुकूल परिणाम प्राप्त करू.’