

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2008मध्ये अंडर-19 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्या संघातील कोहलीचा सहकारी आणि अंतिम सामन्यात दमदार खेळी करणारा एक खेळाडू आता आयपीएल 2025मध्ये पंच म्हणून काम करताना दिसणार आहे. याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तन्मय श्रीवास्तव असे त्याचे नाव आहे. (ipl 2025 tanmay srivastava umpire)
तन्मयने 2008 च्या अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात द. आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर 46 धावांची दमदार खेळी केली होती. त्या स्पर्धेत त्याने सर्वाधिक 262 धावा केल्या होत्या. तो उत्तर प्रदेशकडून स्थानिक क्रिकेट खेळला आहे. काही काळ पंजाब संघाचाही भाग होता. 2020 मध्ये त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अंपायरिंग क्षेत्रात प्रवेश केला. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील अनेक सामन्यांमध्ये त्याने मैदानी पंचाची जबाबदारी यशस्वीरित्या हाताळली. आता त्याला बीसीसीआयने आयपीएलसाठी पंच म्हणून निवडले आहे. याची अधिकृत घोषणा यूपीसीएने केली आहे.
IPL मध्ये माजी खेळाडू पंच होणे हे दुर्मिळ आहे. त्यामुळे तन्मयाचा हा प्रवास क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षणाचा विषय असेल. IPL 2025 मध्ये त्यांची पहिली मॅच कोणती असेल, हे लवकरच स्पष्ट होईल.
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने सोशल मीडियावर माहिती दिली आहे की, तन्मय श्रीवास्तव आयपीएलमध्ये पंच म्हणून काम पाहील. तो आयपीएलही खेळला आहे. 2008 आणि 2009 मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) साठी 7 सामने खेळले. त्याला 3 डावात फक्त 8 धावा करता आल्या. यापैकी सात धावा एकाच सामन्यात झाल्या. त्याला एकही चौकार किंवा एकही षटकार मारता आला नाही.
तन्मयला देशांतर्गत क्रिकेटमध्ये बराच अनुभव आहे. त्याने प्रथम श्रेणीच्या 90 सामन्यांत 4918 धावा, लिस्ट ‘ए’च्या 44 सामन्यांत 1728 धावा, तर 34 टी-20 सामन्यांत 649 धावा केल्या आहेत. तो 2020 मध्ये शेवटचा व्यावसायिक सामना खेळला.