

मँचेस्टर : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेतील साखळी सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १५८ धावा केल्या असून, दक्षिण आफ्रिकेसमोर १५९ धावांचे लक्ष्य ठेवले. मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळवल्या जात असलेल्या या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
हरमनप्रीत कौर ही पुरुष व महिला अशा दोन्ही क्रिकेट प्रकारांत २०० आंतरराष्ट्रीय टी-२० सामने खेळणारी जगातील पहिली खेळाडू ठरल्याने तिच्यासाठी हा सामना खास ठरला.
सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी प्रारंभी ३ षटकांत ३० धावांची सलामी दिली. शेफाली वर्माने १५ चेंडूंत ४ चौकार, १ षटकाराच्या मदतीने ३१ धावा चोपून काढल्या. स्मृती मानधना मात्र १७ धावांवर बाद झाली.
यास्तिका भाटिया (१५ धावा) आणि जेमिमाह रॉड्रिग्ज (१२ धावा) यांना लागोपाठ बाद होत परतावे लागले. हरमनप्रीत कौर २४ धावांवर बाद झाली. दीप्ती शर्माने २१ चेंडूंत २९ धावांची महत्त्वाची खेळी केली तर रिचा घोषने १५ धावांचे योगदान दिले.
भारतीय महिला संघ : २० षटकांत ७/१५८(शेफाली वर्मा ३१, दीप्ती शर्मा २९ हरमनप्रीत कौर २४. मरिझान कॅप २/२७, शबनिम इस्माईल २/२८).