

मुस्तफिजूरला आयपीएलमधून वगळल्यानंतर बीसीबीचे अध्यक्ष आणि बांगलादेशचे माजी कर्णधार अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी बोर्डाची आपत्कालीन बैठक बोलावली.
T20 World Cup 2026
ढाका : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) आगामी टी२० विश्वचषकासाठी आपला संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला संघातून वगळण्यास सांगितले असल्याने भारत आणि बांगलादेशमधील वाद वाढला आहे. बीसीबीने आता या मुद्द्याबाबत एक निवेदन जारी केले आहे, ज्यामध्ये आयसीसीला श्रीलंकेत विश्वचषक सामने आयोजित करण्याची विनंती केली आहे.
'बीसीबी'ने म्हटले आहे की, "गेल्या २४ तासांतील घडामोडी लक्षात घेऊन परिस्थितीचा तपशीलवार आढावा घेतला आहे. भारतातील बांगलादेश संघाच्या सुरक्षेबाबत वाढत्या चिंता आणि बांगलादेश सरकारच्या सल्ल्याचा विचार केल्यानंतर, संचालक मंडळाने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) बांगलादेशचे सर्व सामने भारताबाहेर (सह-यजमान श्रीलंका) वेगळ्या ठिकाणी हलवण्याचा विचार करण्याची औपचारिक विनंती केली आहे."
यापूर्वी, बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या क्रीडा मंत्र्यांनी बीसीबीला आयसीसीला बांगलादेशचे सामने श्रीलंकेत आयोजित करण्याची विनंती करण्याचे निर्देश दिले होते. बांगलादेश क्रीडा मंत्रालयाने म्हटलं आहे की, आयपीएलमधून मुस्तफिजूरला वगळल्याने खेळाडूंच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे. मुस्तफिजूरला आयपीएलमधून वगळल्यानंतर बीसीबीचे अध्यक्ष आणि बांगलादेशचे माजी कर्णधार अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी बोर्डाची आपत्कालीन बैठक बोलावली.
आगामी टी२० विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशच्या संघाताला भारतात चार साखळी सामने खेळायचे आहेत. यातील चार सामने कोलकातामध्ये तर एक मुंबईत होणार आहे. बांगलादेशचे स्पर्धेतील साखळी सामने पुढील प्रमाणे होणार आहेत. वेस्ट इंडिज (७ फेब्रुवारी), इटली (९ फेब्रुवारी) आणि इंग्लंड (१४ फेब्रुवारी) विरुद्ध कोलकाता येथे आणि नेपाळ (१७ फेब्रुवारी) विरुद्ध मुंबईत होणार आहेत. बांगलादेशला इटली, नेपाळ, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजसह ग्रुप क मध्ये स्थान देण्यात आले आहे.
आता या प्रकरणी बीसीसीआयच्या एका सूत्राने स्पष्ट केले आहे की, "एखाद्याच्या मर्जीनुसार तुम्ही खेळाचे स्वरूप बदलू शकत नाही. ही एक मोठी समस्या आहे. विरोधी संघांचा विचार करा. त्यांची विमान तिकिटे आणि हॉटेल्स सर्व बुक केलेली आहेत. शिवाय, दररोज तीन सामने आहेत, म्हणजे एक सामना श्रीलंकेत होईल. प्रसारण पथक देखील उपस्थित आहे. त्यामुळे, हे सांगणे सोपे आहे पण याची अंमलबजावणी करणे सोपे नाही. स्पर्धा सुरू होण्यास फक्त एक महिना शिल्लक असल्याने वेळापत्रक बदलणे आता अशक्य आहे."