

ICC T20 World Cup 2028: भारताने टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताने तब्बल ९६ धावांनी विजय मिळवत विश्वचषक जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष पुढील टी-२० विश्वचषक २०२८ कडे लागले आहे. ही स्पर्धा दोन देशांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणार असून जगभरातील संघ पुन्हा एकदा टी-२० क्रिकेटच्या विश्वचषकासाठी मैदानात भिडताना दिसतील.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) जाहीर केलेल्या माहितीनुसार टी-२० विश्वचषक २०२८ हा स्पर्धेचा अकरावा हंगाम असणार आहे. हा विश्वचषक २१ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२८ या कालावधीत खेळला जाणार आहे. या स्पर्धेचे संयुक्त यजमान ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड असतील. ऑस्ट्रेलियामध्ये हा विश्वचषक दुसऱ्यांदा होणार आहे, तर न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदाच टी-२० विश्वचषकाचे सामने आयोजित केले जाणार आहेत.
या स्पर्धेचे सामने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील काही प्रतिष्ठित क्रिकेट मैदानांवर खेळवले जातील. ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (MCG), सिडनी क्रिकेट ग्राउंड (SCG), अॅडलेड ओव्हल आणि पर्थमधील ऑप्टस स्टेडियम या प्रमुख मैदानांवर सामने होण्याची शक्यता आहे.
तर न्यूझीलंडमध्ये ऑकलंडचे ईडन पार्क, वेलिंग्टनचे स्काय स्टेडियम आणि क्राइस्टचर्चमधील हेगले ओव्हल ही प्रमुख मैदान असतील. या मैदानांवर जगातील सर्वोत्तम खेळाडूंची लढत पाहायला मिळणार आहे.
२०२८ च्या विश्वचषकातही एकूण २० संघ सहभागी होतील. त्यापैकी १२ संघांनी आधीच आपले स्थान निश्चित केले आहे, तर उर्वरित ८ जागांसाठी स्पर्धा होणार आहे. यजमान देश असल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना थेट प्रवेश मिळाला आहे. त्याचबरोबर २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील कामगिरीच्या आधारे भारत (विद्यमान विजेता), इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या संघांनीही आपली जागा पक्की केली आहे.
याशिवाय अफगाणिस्तान, बांगलादेश आणि आयर्लंड या संघांनी ९ मार्च २०२६ पर्यंतच्या आयसीसी टी-२० क्रमवारीच्या आधारे स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. अशा प्रकारे १२ संघांचे स्थान निश्चित झाले असून उर्वरित ८ जागांसाठी पात्रता स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.
स्पर्धेचा फॉरमॅट २०२६ च्या विश्वचषकासारखाच असणार आहे. सुरुवातीला २० संघांना ५-५ संघांच्या चार गटांमध्ये विभागले जाईल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-८ फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर सुपर-८ मधील सर्वोत्तम चार संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि शेवटी दोन सर्वोत्तम संघ अंतिम सामन्यात विश्वविजेतेपदासाठी मैदानात उतरतील.