नवी दिल्ली : भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज इशान किशनने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात आपल्या बॅटने मैदानात आग लावली. त्याने केवळ २० चेंडूत वादळी अर्धशतक पूर्ण करत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय यष्टिरक्षक म्हणून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या उभारण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या खेळीसह त्याने माजी कर्णधार एम.एस. धोनीचा कित्येक वर्षांचा विक्रम मोडीत काढला.
इशान किशनने नामिबियाविरुद्ध २४ चेंडूत ६१ धावांची स्फोटक खेळी केली, ज्यामध्ये ६ चौकार आणि ५ गगनभेदी षटकारांचा समावेश होता. टी-२० विश्वचषकात भारतीय यष्टिरक्षक फलंदाजाद्वारे ही आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी ठरली आहे. यापूर्वी २००७ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एम.एस. धोनीने ४५ धावा केल्या होत्या. तब्बल १९ वर्षांनंतर इशानने हा आकडा पार करून अव्वल स्थान पटकावले आहे.
६१ धावा: इशान किशन विरुद्ध नामिबिया (२०२६)
४५ धावा: एम.एस. धोनी विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२००७)
४२ धावा: ऋषभ पंत विरुद्ध पाकिस्तान (२०२४)
३९ धावा: ऋषभ पंत विरुद्ध पाकिस्तान (२०२१)
इशानने केवळ धावांचा डोंगरच रचला नाही, तर षटकारांच्या बाबतीतही दिग्गज भारतीय फलंदाजांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. एकाच डावात ५ षटकार ठोकल्यामुळे तो आता युवराज सिंह, सुरेश रैना आणि हार्दिक पंड्या यांच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. या यादीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८ षटकार ठोकणारा रोहित शर्मा अजूनही अग्रस्थानी आहे.
८ षटकार: रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०२४)
७ षटकार: युवराज सिंह विरुद्ध इंग्लंड (२००७)
६ षटकार: रोहित शर्मा विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२०१०)
५ षटकार: इशान किशन विरुद्ध नामिबिया (२०२६) (युवराज सिंह, सुरेश रैना आणि हार्दिक पंड्या यांनीही ५-५ षटकार मारले आहेत.)
इशानच्या या तुफानी खेळीमुळे भारताने नामिबियासमोर धावांचे डोंगरासारखे आव्हान उभे केले.