

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टी-२० विश्वचषक २०२६ चा थरार उद्या, ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेच्या उंबरठ्यावर भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. वेगवान गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे या संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्या जागी अनुभवी गोलंदाज मोहम्मद सिराज याला संघात स्थान मिळण्याची चिन्हे आहेत.
विश्वचषकाचा पहिला सामना सुरू होण्यास २४ तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने हर्षित राणाच्या अनुपलब्धतेबाबत संकेत दिले आहेत. पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बोलताना सूर्यकुमार म्हणाला, "हर्षितला अद्याप अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर काढलेले नाही, मात्र त्याचे खेळणे सध्या साशंक वाटत आहे. आज संध्याकाळपर्यंत यावर अंतिम निर्णय होईल."
शुक्रवारी, अमेरिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादवने हर्षितच्या प्रकृतीबाबत भाष्य केले. तो म्हणाला, "हर्षित अद्याप अधिकृतपणे बाहेर गेलेला नाही, फिजिओ त्याच्यावर उपचार करत आहेत. मात्र, सध्यातरी परिस्थिती फारशी सकारात्मक दिसत नाही. जर तो खेळू शकला नाही, तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करण्यास तयार आहोत."
बुधवारी नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात हर्षितच्या गुडघ्याला दुखापत झाली. गोलंदाजी दरम्यान तो अस्वस्थ दिसत होता आणि त्याने दोनदा आपला 'रन-अप' मध्येच थांबवला. त्याने त्या सामन्यात केवळ एक षटक टाकले. त्यानंतर वेदनांमुळे त्याला मैदान सोडावे लागले. अद्याप भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याच्या दुखापतीच्या गंभीरतेबाबत अधिकृत घोषणा केली नसली, तरी प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार तो स्पर्धेतून बाहेर पडेल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
हर्षित राणासारखा फॉर्मात असलेला गोलंदाज बाहेर गेल्यास भारतीय आक्रमणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आता संध्याकाळपर्यंत त्याच्या जागी कोणाची वर्णी लागते, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
हर्षितला पर्याय म्हणून कोणाची निवड होईल, या प्रश्नावर सूर्याने स्पष्ट केले की, गेल्या १-२ वर्षांत प्रभावी कामगिरी करणाऱ्या आणि गरज पडल्यास फलंदाजी करू शकणाऱ्या गोलंदाजांना प्राधान्य दिले जाईल. "आम्ही सर्वोत्तम पर्यायाची निवड करू. जरी आम्हाला हर्षितची उणीव भासणार असली, तरी आमच्याकडे विविध समीकरणे आजमावण्यासाठी पुरेसे खेळाडू उपलब्ध आहेत," असेही त्याने नमूद केले.
भारतीय संघ व्यवस्थापन इतर दुखापतग्रस्त खेळाडूंच्या प्रकृतीवरही लक्ष ठेवून आहे. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर पोटाच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकला होता, मात्र तो विश्वचषक संघात कायम असून लवकरच तंदुरुस्त होण्याची आशा आहे. दुसरीकडे, तिलक वर्मा दुखापतीतून सावरून संघात परतला असून त्याने दोन सराव सामन्यांमध्ये भाग घेतला आहे, ही भारतासाठी दिलासादायक बाब आहे.
गतविजेता भारतीय संघ ७ फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजता अमेरिकेविरुद्ध भिडणार आहे. 'ग्रुप-ए' मध्ये असलेल्या भारतासाठी सुरुवातीचे सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. अमेरिकेनंतर १२ फेब्रुवारीला नामिबिया आणि त्यानंतर १५ फेब्रुवारीला कोलंबोच्या मैदानावर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध महामुकाबला होणार आहे. या हाय-व्होल्टेज सामन्याची जगभरातील क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. अशा स्थितीत हर्षित राणासारखा प्रभावी गोलंदाज बाहेर जाणे हा भारतासाठी मोठा तांत्रिक धक्का ठरू शकतो.