

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा स्फोटक शैलीत पुनरागमन केले आहे. सूर्यासोबतच शिवम दुबेची बॅटही चमकली आहे. दुसरीकडे पृथ्वी शॉ धावा करायचे विसरून गेला आहे की काय असे चित्र आहे. आधीच आयपीएलमधून बाहेर असलेल्या शॉसाठी ही कठीण वेळ आहे, ज्यातून तो अजूनही सावरू शकलेला नाही.
टीम इंडिया सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे, तर उर्वरित खेळाडू सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी खेळण्यात व्यस्त आहेत. सूर्यकुमार यादवने बहिणीच्या लग्नामुळे क्रिकेटमधून काही दिवस विश्रांती घेतली होती, मात्र आता त्याने पुनरागमन केले आहे. मुंबई आणि सर्व्हिसेस यांच्यात झालेल्या सामन्यात सूर्याची बॅट तळपली आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली मुंबई संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला तेव्हा पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे सलामीवीर म्हणून आले. पृथ्वी शॉ केवळ तीन चेंडूंचा सामना करू शकला आणि खाते न उघडता बाद झाला. मात्र, अजिंक्य रहाणेने 18 चेंडूत 22 धावांची छोटी पण उपयुक्त खेळी खेळली. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने 14 चेंडूत 20 धावा केल्या. सूर्यकुमार यादवला शिवम दुबेची साथ लाभली. एकीकडे सूर्यकुमार यादवने 46 चेंडूत 70 धावा केल्या, तर शिवम दुबेनेही 36 चेंडूत 71 धावा कुटल्या.
सूर्यकुमार यादवने आपल्या डावात चार षटकार आणि सात चौकार मारले, तर शिवम दुबेने सात षटकार आणि दोन चौकार लगावले. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत केवळ 4 गडी गमावून 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात सर्व्हिसेस संघ फलंदाजीसाठी आला तेव्हा त्यांचा संपूर्ण संघ 19.3 षटकांत 153 धावांतच ऑलआऊट झाला. यासह मुंबईने 39 धावांच्या मोठ्या फरकाने सामना जिंकला.