

Gavaskar Sanju Samson Compares to Viv Richards Mahela Jayawardene
मुंबई : भारताचे माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर यांनी संजू सॅमसनच्या फलंदाजीचे तोंडभरून कौतुक केले आहे. संजूच्या खेळात विव रिचर्ड्स आणि महेला जयवर्धने यांची झलक पाहायला मिळाली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
ते पुढे म्हणाले की, ‘दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर सॅमसनने भारतीय संघाला सावरले आणि त्यानंतर प्रत्येक सामना 'नॉकआउट' असताना सॅमसनने सलग तीन अर्धशतके ठोकून अवघ्या पाच सामन्यांत 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट'चा किताब पटकावला. सॅमसनच्या विस्मयकारक फॉर्मशिवाय भारताला टी-२० विश्वचषक जिंकणे कठीण गेले असते. वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ९७, इंग्लंडविरुद्ध ८९ आणि न्यूझीलंडविरुद्ध ८९ धावांच्या त्याच्या खेळींनी भारताच्या विश्वविजयाचा मार्ग सुकर केला,’ असे मतही गावस्करांनी व्यक्त केले.
गावस्कर यांनी नमूद केले की, ‘सॅमसनची खरी कसोटी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरविरुद्ध होती. आर्चरचा वेग आणि शरीराला लक्ष्य करण्याची पद्धत यामुळे सॅमसन यापूर्वी अडचणीत आला होता. मात्र, यावेळी सॅमसनने आर्चरच्या १४ चेंडूंवर ३८ धावा कुटत त्याचे वर्चस्व मोडीत काढले. सॅमसनचा हा आवेश विव रिचर्ड्स यांच्या शैलीची आठवण करून देणारा होता.’
'स्पोर्टस्टार'मधील आपल्या स्तंभात गावस्कर लिहितात, ‘फलंदाजीतील शुद्धता सामान्यतः कसोटी किंवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळते, परंतु टी-२० सारख्या अतिवेगवान फॉरमॅटमध्ये ती दुर्मिळ असते. सॅमसनने आपल्या तिन्ही अर्धशतकी खेळींमध्ये अभिजात क्रिकेट शॉट्सचे प्रदर्शन केले. जोफ्रा आर्चरच्या तुफानी वेगावर त्याने मारलेले पुल आणि हूक शॉट्स विव रिचर्ड्स यांच्या वैभवाची आठवण करून देणारे होते, तरीही त्याची एकूण फलंदाजी श्रीलंकेचा शैलीदार फलंदाज महेला जयवर्धनेसारखी भासते.’
विश्वचषकाच्या सुरुवातीला इशान किशन आणि अभिषेक शर्मा हे भारताचे सलामीवीर म्हणून निश्चित होते. सॅमसनला स्थान मिळालेच तर तो मधल्या फळीत खेळेल असा अंदाज होता. मात्र, अभिषेक शर्माचा खराब फॉर्म आणि रिंकू सिंहच्या कौटुंबिक अडचणींमुळे जो बदल झाला त्यात सॅमसनला सलामीची संधी मिळाली. झिम्बाब्वेविरुद्धच्या २४ धावांच्या खेळीनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरने दिलेली शाबासकी सॅमसनच्या पुनरागमनाची नांदी ठरली.
गावस्कर पुढे म्हणतात, ‘एका खेळीने नशीब कसे बदलू शकते, याचे संजू सॅमसन हे उत्तम उदाहरण आहे. विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत खराब कामगिरीमुळे तो शर्यतीतही नव्हता. मात्र, परिस्थिती बदलली आणि सलामीला डाव्या-उजव्या फलंदाजाचे कॉम्बिनेशन साधण्यासाठी सॅमसनला संधी दिली गेली. अभिषेक शर्मा अपयशी ठरत असताना सॅमसनने या संधीचे सोने केले आणि अशा तीन अविस्मरणीय खेळी साकारल्या ज्या वर्षानुवर्षे स्मरणात राहतील.’