India vs Pakistan Shubman Gill
नवी दिल्ली: आशिया चषक सुपर फोरमधील भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने मिळवलेल्या शानदार विजयानंतर भारताचा उपकर्णधार शुभमन गिलने सोशल मीडियावर एक खास पोस्ट केली. अवघ्या चार शब्दांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत असून, यामध्ये त्याने विजयानंतरचा माहोल अचूकपणे टिपला आहे.
भारताने रविवारी पाकिस्तानला आणखी एकदा चारीमुंड्या चीत केले आणि तमाम भारतवासीयांना नवरात्रौत्सवानिमित्त विजयाची हवीहवीशी भेट दिली. त्यानंतर काही वेळातच गिलने सामन्यातील काही फोटो शेअर करत "Game speaks, not words" (खेळ बोलतो, शब्द नाही) असे दिले. ही पोस्ट लगेच चर्चेत आली आणि चाहत्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. या सामन्यात खेळाडूंमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकींना हे एक सडेतोड उत्तर असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.
सामना खूपच तणावपूर्ण होता. पाकिस्तानने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने सात चेंडू राखून विजय मिळवला. यामध्ये सलामीवीर अभिषेक शर्माने ७४ आणि शुभमन गिलने ४७ धावांची दमदार खेळी केली. या दोघांनी अवघ्या नऊ षटकांत १०५ धावांची भागीदारी रचून पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांवर दडपण ठेवले.
सामन्यादरम्यान खेळाडूंच्या वादानेही लक्ष वेधले. पहिल्याच षटकात अभिषेक शर्माने शाहीन आफ्रिदीला षटकार मारल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर शुभमन गिल आणि हरिस रौफ यांच्यातही वाद झाल्याचे दिसून आले. या स्पर्धेत दुसऱ्यांदा भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंबरोबर हस्तांदोलन न करताच मैदान सोडले, ज्यामुळे दोन्ही संघांमधील शत्रुत्व पुन्हा एकदा समोर आले. गिलने आपल्या पोस्टमधून सर्व अनावश्यक चर्चांना बाजूला सारले आणि भारताची मैदानावरील कामगिरीच पाकिस्तानच्या आक्रमकतेला पुरेसे उत्तर आहे, हे स्पष्ट केले.