

बँकॉक; वृत्तसंस्था : भारताची स्टार बॅडमिंटन जोडी सात्त्विक साईराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेत मलेशियाच्या गोह झे फेई आणि नूर इझ्झुद्दीन या जोडीचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. 2026 च्या हंगामातील या भारतीय जोडीची ही पहिलीच फायनल आहे. रोमहर्षक ठरलेल्या या उपांत्य सामन्यात अव्वल मानांकित सात्त्विक आणि चिरागने 1 तास 22 मिनिटांच्या मॅरेथॉन लढतीमध्ये 19-21, 22-20, 21-16 अशी बाजी मारली.
सुरुवातीला मलेशियन जोडीने आक्रमक सुरुवात करत 3-1 अशी आघाडी घेतली. सात्त्विक-चिरागने शानदार पुनरागमन करत 7-7 अशी बरोबरी मिळवली. पण, त्यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा लाभ घेत मलेशियाने पुन्हा आघाडी घेतली. भारतीयांनी सलग 4 गुण घेतले खरे, पण मलेशियाने पहिला गेम 21-19 असा जिंकला.
दुसर्या गेममध्ये सात्त्विक-चिरागने चुका सुधारत मध्यंतरापर्यंत 11-9 अशी आघाडी घेतली. ब्रेकनंतर मलेशियन जोडीने जोरदार पुनरागमन केले आणि स्कोअर 20-20 असा बरोबरीत आणला. यानंतर सात्त्विकने अप्रतिम विनर मारत दुसरा गेम 22-20 असा जिंकून दिला.
दुसर्या गेममधील विजयामुळे भारतीय जोडीचा आत्मविश्वास वाढला. निर्णायक आणि तिसर्या गेममध्ये सात्त्विक-चिरागने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. त्यांनी मलेशियाला पुनरागमन करण्याची कोणतीही संधी न देता तिसरा गेम 21-16 असा सहज जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.
शानदार कमबॅक : पहिला गेम गमावल्यानंतर सात्त्विक-चिरागने एक तास 22 मिनिटांच्या लढतीत विजय मिळवून फायनल गाठली.
हंगामातील पहिली फायनल : 2026 च्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन हंगामात भारतीय जोडी पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचली आहे.
एकमेव आशा : सिंधू आणि लक्ष्य सेन स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे आता भारताच्या जेतेपदाची मदार केवळ सात्त्विक-चिरागवर आहे.