पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात झाली. बुधवारी बेंगळुरू कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाला होता. परिणामी दुस-या दिवशी टॉस होऊन प्रत्यक्ष खेळ सुरू झाला. रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण भारतीय फलंदाजांनी लाजिरवाणे प्रदर्शन केले. संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांत तंबूत परतला. त्यानंतर गोलंदाजीतही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडने दुस-या दिवसाअखेर 3 बाद 180 धावा करून 134 धावांची आघाडी घेतली आहे.
दरम्यान, खराब फलंदाजीनंतर आता टीम इंडियाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आहे. वास्तविक, विकेटकीपिंग करताना पंतला ही दुखापत झाली. दुखापतीनंतर पंतला चालता येत नव्हते, त्यामुळे त्याला मैदानाबाहेर काढण्यात आले. त्याच्या जागी ध्रुव जुरेलला विकेटकीपिंगसाठी मैदानात बोलावण्यात आले. पंतच्या दुखापतीमुळे आता टीम इंडियाचे टेन्शन थोडे वाढले आहे. मात्र, त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही.
ही घटना 37व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर घडली. रवींद्र जडेजाने फेकलेला चेंडू वेगाने फिरला आणि पंतच्या उजव्या गुडघ्यावर आदळला. यानंतर तो मैदानात आडवा पडला. त्याला वेदना होत होत्या. त्यामुळे तत्काळ फिजिओला बोलवण्यात आले. वेदना कमी होण्यासाठे स्प्रे मारण्यात आला. पण उपचारानंतरही वेदना सुरूच असल्याने अखेर पंतला मैदान सोडावे लागले. त्याच्या जागी ध्रुव जुरेल विकेटकीपिंग आला. डिसेंबर 2022 पासून मैदानाबाहेर राहिल्यानंतर, पंतने भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेत कसोटी संघात पुनरागमन केले आणि या मालिकेत पंतने चमकदार कामगिरी केली आणि शतकही केले.
पंतने गुरुवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या डावात सर्वाधिक धावा केल्या. त्याने 49 चेंडूत 20 धावा केल्या होत्या. भारताच्या पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही.