

PV Sindhu injury comeback : २०२५ मधील गंभीर दुखापतीनंतर करिअरमधील अत्यंत कठीण टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी माजी कर्णधार विराट कोहलीशी झालेल्या एका संवादाने कशी मदत केली, यावर दोन वेळची ऑलिंपिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने उघडपणे भाष्य केले आहे. या संवादातून मिळालेल्या प्रेरणेमुळेच सिंधूने ऐतिहासिक जपान ओपन विजेतेपदावर नाव कोरत जबरदस्त पुनरागमन केले आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये सरावादरम्यान सिंधूच्या पायाच्या बोटाचा लिगामेंट फाटला होता. त्यामुळे तिला तो हंगाम अर्धवट सोडून पूर्णपणे दुखापतीतून सावरण्यावर (रिहॅब) लक्ष केंद्रित करावे लागले होते. प्रसिद्ध क्रीडा अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दिनशा पारडीवाला यांच्या देखरेखीखाली सिंधूने तीन महिने पूर्ण विश्रांती घेतली आणि त्यानंतर पुनर्वसनाची टप्प्याटप्प्याने प्रक्रिया पूर्ण केली.त्या आव्हानात्मक काळात सिंधूने तिचे पती व्यंकट दत्ता साई यांच्यासह मार्गदर्शन मिळवण्यासाठी विराट कोहलीशी संपर्क साधला होता. माजी भारतीय कर्णधाराने त्याला तात्काळ प्रतिसाद दिला आणि दुसऱ्याच दिवशी त्या तिघांची भेट झाली.
पतीच्या 'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत सिंधूने 'X' पोस्टच्या माध्यमातून ही भावनाप्रधान आठवण शेअर केली. कोहलीसोबतची ती भेट तिच्या पुनरागमनासाठी कशी 'टर्निंग पॉइंट' ठरली, यावर तिने प्रकाश टाकला. ते लिहिलं आहे की, "ज्या एका गोष्टीसाठी मी नेहमीच कृतज्ञ राहीन, ती म्हणजे 'विराट भाई'. माझ्या कारकिर्दीतील अत्यंत बिकट प्रसंगी मी त्याच्याशी संपर्क साधला होता. दुखापती वाढत होत्या, कामगिरी होत नव्हती आणि मला अशा व्यक्तीची गरज होती जो ही परिस्थिती समजू शकेल.त्याने अवघ्या काही मिनिटांत उत्तर दिले आणि आम्ही दुसऱ्याच दिवशी भेटलो.
आमच्यात काय बोलणे झाले ते नेहमीच आमच्यातच राहील, पण जेव्हा मला कोणाची तरी गरज होती, तेव्हा तो पाठीशी उभा राहिला, याबद्दल मी नेहमीच आभारी राहीन. तो फार काही बोलला नाही, पण त्याचा प्रत्येक शब्द माझ्या आणि दत्ताच्या मनात घर करून गेला. काही संवाद तुमचे दृष्टिकोन बदलून टाकतात; हा त्यातलाच एक होता, असेही सिंधुने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
'द इंडियन एक्सप्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत सिंधूचे पती व्यंकट दत्ता साई यांनी स्पष्ट केले की, दुखापतीतून सावरण्याच्या संपूर्ण प्रवासात कोहलीच्या शब्दांनी त्यांना सतत प्रेरणा दिली. "आम्हाला सिंधूचा खेळातील आनंद पुन्हा निर्माण करायचा होता आणि विराटचे शब्द माझ्या डोक्यात सतत घुमत होते. अटलांटा येथील 'Exos Sports Performance' सेंटरमध्ये तिने वेन, टिम आणि रायन या तीन उत्कृष्ट ट्रेनर्सच्या मार्गदर्शनाखाली कठोर सराव केला," अशी आठवण दत्ता यांनी सांगितली.
या दमदार पुनरागमनाचा सुवर्ण अध्याय १९ जुलै २०२६ रोजी लिहिला गेला. सिंधूने जपान ओपन महिला एकेरीचे विजेतेपद पटकावून इतिहास रचला. जपान ओपनच्या ४३ वर्षांच्या इतिहासात हे प्रतिष्ठित विजेतेपद जिंकणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.या स्पर्धेत जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानी असलेल्या ३१ वर्षीय सिंधूने टोकियो मेट्रोपॉलिटन जिम्नॅशियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. तिने स्थानिक खेळाडू आणि जपानची जागतिक नंबर ३ खेळाडू अकाने यामागुचीचा २१-१७, २१-१७ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला.