

Mohammed Shami
मुंबई: देशांतर्गत क्रिकेटच्या २०२५-२६ हंगामात बंगालकडून खेळताना तब्बल ६७ विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमीला अद्याप भारतीय संघात पुनरागमन करता आलेले नाही. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर अद्याप शमीच्या कामगिरीवर पूर्णपणे समाधानी नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर, ३५ वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या निवृत्तीच्या चर्चांवर मौन सोडले असून निवडकर्त्यांना थेट संदेश दिला आहे.
२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात शमीचा मोठा वाटा होता. त्यानंतर २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघातही त्याचा सहभाग होता. मात्र, त्यानंतर पूर्णपणे तंदुरुस्त होऊनही आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने त्याला सातत्याने डावलले. दुखापतींमुळे शमीला अनेक द्विपक्षीय मालिकांना मुकावे लागले, परंतु तंदुरुस्त झाल्यानंतरही दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड विरुद्धच्या मालिका आणि टी-२० विश्वचषकासाठी त्याचा विचार झाला नाही.
'द शुभंकर मिश्रा शो'मध्ये बोलताना शमीने निवृत्तीच्या प्रश्नावर सडेतोड उत्तर दिले. तो म्हणाला, "ज्या दिवशी मला थकवा जाणवेल, त्या दिवशी मी निरोप घेईन. पण सध्या तरी मी निवृत्तीचा विचारही करत नाहीये, कारण असे विचार तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करतात. जर असा विचार मनात आला, तर याचा अर्थ तुम्ही आधीच थकलेले आहात आणि तुम्हाला खेळाचा कंटाळा आला आहे."तो पुढे म्हणाला, "मी आधीही सांगितले आहे, ज्या दिवशी सकाळी उठल्यावर मला क्रिकेटचा कंटाळा येईल, त्या दिवशी मी खेळ सोडेन. पण सध्या मला ना कंटाळा आला आहे, ना मी आळशी झालो आहे. मी खेळाचा आनंद घेत आहे आणि माझे निकालही सकारात्मक आहेत."
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात सनरायझर्स हैदराबादने शमीला विकत घेतले होते, मात्र तो हंगाम त्याच्यासाठी फारसा चांगला ठरला नाही. आगामी २०२६ च्या हंगामापूर्वी त्याला संघातून मुक्त करण्यात आले असून, आता तो लखनऊ सुपर जायंट्स (LSG) कडून खेळताना दिसेल.आपल्या तयारीबद्दल बोलताना शमी म्हणाला, "एक गोलंदाज म्हणून मी माझे १०० टक्के योगदान देईन. लखनऊ संघाने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो सार्थ ठरवण्याचा मी प्रयत्न करेन. नशीब मी बदलू शकत नाही, पण माझा दृष्टिकोन आणि जिद्द माझ्या हातात आहे. माझी लय (Rhythm) चांगली आहे आणि मी भविष्याचा सकारात्मक विचार करत आहे."