
मुंबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १९ व्या हंगामाचा बिगुल वाजला असून २८ मार्च २०२६ पासून क्रिकेटच्या या महाकुंभाला सुरुवात होत आहे. गेल्या १८ हंगामांत आयपीएलने अनेक चढ-उतार आणि रोमांचक सामने पाहिले आहेत. काही संघांना अद्याप एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेले नाही, तर काही संघांनी या स्पर्धेत आपले निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. आगामी हंगामाच्या पार्श्वभूमीवर, आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या अव्वल ५ संघांचा घेतलेला हा आढावा..
अद्याप एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकता न आलेला पंजाब किंग्सचा संघ या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. पंजाबने आतापर्यंत एकूण २६३ सामने खेळले असून त्यापैकी १२२ सामन्यांत विजय मिळवला आहे. १४० सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.
पहिल्या आयपीएल ट्रॉफीसाठी १८ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा करणाऱ्या आरसीबीचा विजय मिळवण्याचा विक्रमही कौतुकास्पद आहे. आरसीबीने आतापर्यंत २७१ सामने खेळले असून त्यापैकी १३४ सामने जिंकले आहेत, तर १३३ सामन्यांत त्यांचा पराभव झाला आहे. ४ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.
तीन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेला कोलकाता नाईट रायडर्स हा तिसरा सर्वात यशस्वी संघ आहे. केकेआरने आतापर्यंत २६५ सामने खेळले असून त्यातील १३६ सामन्यांत विजय मिळवला आहे. १२७ सामन्यांत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले असून दोन सामन्यांचा निकाल लागू शकला नाही.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ५ वेळा विजेतेपद मिळवणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांच्या बंदीमुळे चेन्नईने १८ पैकी केवळ १६ हंगामांत सहभाग घेतला आहे. सीएसकेने आतापर्यंत २५३ सामने खेळले असून त्यापैकी १४२ सामन्यांत यश संपादन केले आहे, तर १०९ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. दोन सामने पावसामुळे अनिर्णित राहिले.
आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सने या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. संयुक्तपणे सर्वाधिक ५ वेळा करंडक जिंकणाऱ्या मुंबईने आतापर्यंत १८ हंगामांत एकूण २७७ सामने खेळले आहेत. त्यापैकी १५३ सामन्यांत त्यांना विजय मिळाला आहे, तर १२४ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.