

जसप्रीत बुमराह याने अद्याप आयपीएलमध्ये खाते उघडले नसले तरी झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक पॉमी म्बांग्वा पॉमी म्बांग्वा यांनी त्याच्यावर विश्वास दर्शवला आहे.
Jasprit Bumrah IPL 2026
मुंबई : यंदाच्या आयपीएल २०२६ हंगामात टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अद्याप आपल्या जुन्या लयीत परतण्यासाठी संघर्ष करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामातील गेल्या चार सामन्यांमध्ये बुमराहला एकही बळी मिळवता आलेला नाही. बुमराहची विकेटची पाटी कोरी राहिल्याने त्याच्या फॉर्मबाबत चर्चा सुरु झाली असली तरी झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक पॉमी म्बांग्वा त्याच्या कामगिरीचे समर्थन केले आहे.
यंदाच्या हंगामात बुमराहने विविध मैदानांवर गोलंदाजी केली, परंतु विकेट्सचे खाते उघडण्यात त्याला अपयश आले आहे. त्याची गेल्या चार सामन्यांतील आकडेवारी पुढीलप्रमाणे:
०/४० (४ षटके) वि. पंजाब किंग्स (PBKS), अहमदाबाद
०/३५ (४ षटके) वि. कोलकाता नाईट रायडर्स (KKR), वानखेडे
०/२१ (४ षटके) वि. दिल्ली कॅपिटल्स (DC), दिल्ली
०/३२ (३ षटके) वि. राजस्थान रॉयल्स (RR), गुवाहाटी
जसप्रीत बुमराह याने अद्याप आयपीएलमध्ये खाते उघडले नसले तरी झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक पॉमी म्बांग्वा पॉमी म्बांग्वा यांनी त्याच्यावर विश्वास दर्शवला आहे. 'क्रिकबझ'शी बोलताना म्बांग्वा म्हणाले, "पहिल्या सामन्यात जेव्हा फलंदाज चौफेर फटकेबाजी करत होते, तेव्हा बुमराहने ज्या पद्धतीने खेळ फिरवला ते अत्यंत प्रभावी होते. अनेकदा त्याला विकेट्स मिळत नाहीत; पण तो निर्धाव चेंडू टाकून समोरच्या संघावर प्रचंड दडपण निर्माण करतो."
"ज्या सामन्यात सरासरी १० ते १५ धावा केल्या जातात. तिथे बुमराह केवळ ४ किंवा ५ धावांचे षटक टाकून धावगतीवर अंकुश ठेवतो. तो सलग दोन सामन्यांत अपयशी ठरणारा गोलंदाज नाही. दिल्लीतील कामगिरी थोडी सामान्य होती, पण ते मैदान त्याला फारसे मानवणारे नाही. तो लवकरच आपल्या जुन्या फॉर्मात परतताना दिसेल, असा विश्वासही म्बांग्वा यांनी व्यक्त केला आहे.
बुमराहच्या सध्याच्या फॉर्मवर चर्चा होत असली तरी, त्याने नुकत्याच पार पडलेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत त्याने भेदक गोलंदाजने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेत त्याने तब्बल १४ विकेट घेत अव्वल स्थान पटकावले होते. विशेषतः उपांत्य आणि अंतिम फेरीत त्याने केलेली कामगिरी निर्णायक ठरली होती. अंतिम सामन्यात अवघ्या १५ धावांत ४ बळी घेत भारताला जेतेपद मिळवून देण्यात त्याने मोलाचा वाटा उचलला. तसेच अंतिम सामन्यात 'सामनावीर' पुरस्कारावरही त्याने आपलं नाव कोरलं होतं.