

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2025 मध्ये खेळपट्ट्या संघांसाठी मोठे आव्हान ठरत आहेत. केकेआर आणि सीएसकेनंतर आता आरसीबीनेही चिन्नास्वामी स्टेडियममधील खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संघाचे मेंटॉर दिनेश कार्तिक यांनी सांगितलं की, फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीची मागणी केली होती, पण तशी खेळपट्टी मिळाली नाही. त्यांनी असेही स्पष्ट केले की, लवकरच संघ या मुद्द्यावर पीच क्युरेटरशी चर्चा करणार आहे.
कार्तिक यांच्या आधी लखनौ सुपर जायंट्सचे मार्गदर्शक झहीर खान, चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांनीही त्यांच्या घरच्या खेळपट्ट्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
गुरुवारी (दि. 10) रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. या हंगामात, रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील आरसीबीने 5 पैकी 2 सामने गमावले असून हे दोन्ही पराभव त्यांना त्यांच्याच घरच्या मैदानावर पत्करावे लागले आहेत. दरम्यान, आरसीबीने खेळपट्टीमुळे आम्ही दिल्ली विरुद्धचा सामना हरलो, असे धक्कादायक विधान केले आहे.
कार्तिक म्हणाले की, ‘चिन्नास्वामी स्टेडियममधील सध्याच्या खेळपट्टीमुळे आरसीबीला घरच्याच मैदानावर परिस्थितीचा फायदा होत नाहीय. पहिल्या दोन सामन्यांसाठी आम्ही येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकुल करण्याची मागणी केली होती. पण आमची मागणी पूर्ण झालेली नाही. येथे फलंदाजी करणे आव्हानात्मक आहे. पण आम्ही जे सर्वोत्तम आहे ते करण्याचा प्रयत्न करू. खेळपट्टीविषयी आम्ही निश्चितच क्युरेटर्सशी चर्चा करू. ते पुढील सामन्यांसाठी आमची मागणी मान्य करतील, असा विश्वास व्यक्त करतो.’
‘मोठे फटके, चौकार-षटकारांची आतषबाजी होणे हा टी-20 सामन्याचा महत्त्वाचा भाग आहे. धावांचा पाऊस पडणे हे सर्वांना आवडते. त्यामुळे मला वाटते की ज्या पद्धतीने टी-20 क्रिकेट खेळले जाते, त्यात जितक्या जास्त धावा असतील तितके ते प्रसारकांसाठी आणि चाहत्यांसाठी चांगले आहे. सध्या आमचा संघ घरच्या मैदानावर अपयशी ठरला आहे. पण येणा-या सामन्यांमध्ये आम्ही शक्य तितके सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू,’ असेही कार्तिक यांनी सांगितले.
‘प्रत्येक खेळपट्टीवर आपण इथे कसा खेळ केला पाहिजे हे समजून घेण्याचा प्रत्येक संघाचा प्रयत्न असतो. संघ कोणत्याही ठराविक साच्यात खेळत नाही. मात्र, अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर फलंदाजांसाठी स्टाईक रोटेट करणेही कठीण होते. मोठे शॉट्स मारणेही सोपे राहत नाही. प्रत्येक खेळपट्टीवर खेळण्याचा योग्य मार्ग काय आहे, हे समजून घेणे गरजेचे असते. पण जेव्हा खेळपट्टी इतकी कठीण असेल की स्ट्राइक रोटेट करायलाही अडचण येईल, तेव्हा परिस्थिती अधिक आव्हानात्मक होते. पण हे T20 क्रिकेट आहे, इथे धोका पत्करावाच लागतो. अशा वेळी विकेट्सही पडू शकतात.’ असेही कार्तिक यांनी स्पष्टीकरण दिले.