

मुंबई ; वृत्तसंस्था : आयपीएलचा (IPL 2022) पंधरावा हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन संघांनी याआधीच प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर उरलेल्या संघांमध्ये प्ले ऑफपर्यंत पोहोचण्यासाठी चढाओढ रंगली आहे. असे असताना आता बीसीसीआयने अंतिम सामन्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. या सामन्याची वेळ 7.30 ऐवजी 8 वाजता करण्यात आली आहे.
येत्या 29 मे रोजी आयपीएल क्रिकेटचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. याआधी या सामन्याची सुरुवात सायंकाळी 7.30 वाजता होणार होती. तर अर्ध्या तासाआधी म्हणजेच 7 वाजता नाणेफेक होणार होती. मात्र, आता बीसीसीआयने या सामन्याची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला असून सामना 7.30 ऐवजी अर्धा तसा उशिराने म्हणजेच 8 वाजता सुरू होण्याची शक्यता आहे. तर नाणेफेक 7.30 वाजता केली जाऊ शकते.
दरम्यान, आयपीएलचा (IPL 2022) अंतिम सामना अहमदाबादमधील मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. सध्या प्ले ऑफमध्ये लखनौ आणि गुजरात या संघांनी आपले स्थान पक्के केले आहे. आणखी दोन संघांची प्ले ऑफमध्ये निवड झाल्यानंतर एकूण चार संघांमध्ये प्ले ऑफचे सामने खेळवले जातील. त्यानंतर टॉप दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवला जाईल.
सामना उशिराने सुरू करण्याचे नेमके कारण काय? (IPL 2022)
क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयकडून आयपीएलमध्ये पुन्हा एकदा उद्घाटन आणि समापन समारोह आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. या हंगामात उद्घाटन समारंभाचे आयोजन करता आले नाही. मात्र, यावेळी समापन समारोह आयोजित केला जाणार आहे. हा समारोहाची सुरुवात 6.30 वाजता सुरू होणार असून तो 50 मिनिटांचा असेल. समापन समारोह संपल्यानंतर नाणेफेक आणि अंतिम सामन्याला सुरुवात होईल. याच कारणामुळे आयपीएलचा अंतिम सामना अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे.