![Archery World Cup](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-06%2F21631aa8-5ce5-408c-a200-ab8a16a590e9%2Findian_womens_compound_archery_team.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : Archery World Cup : अव्वल मानांकित भारतीय महिला कंपाउंड संघाने शनिवारी तिरंदाजी विश्वचषक स्टेज-3 मध्ये सुवर्णपदक जिंकले. ज्योती सुरेखा वेनम, अदिती स्वामी आणि प्रनीत कौर या भारतीय त्रिकुटाने रोमहर्षक अंतिम सामन्यात सहाव्या क्रमांकावरील एस्टोनियाच्या लिसेल जात्मा, मिरी मेरीटा पास आणि मारिस टेट्समन यांचा 232-229 असा पराभव करून सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली.
भारतीय महिला तिरंदाज संघाने तुर्कीतील स्पर्धेत सलग तिसऱ्या सुवर्णपदकावर नाव कोरले.
ज्योती सुरेखा वेनम, अदिती स्वामी, प्रनीत कौर यांनी सुवर्णपदकाचा वेध घेतला.
संघाने एप्रिलमध्ये शांघाय आणि मे महिन्यात येचिओन येथे झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात सुवर्णपदक जिंकले होते.
अंटाल्या (तुर्की) येथे आयोजित 10 राष्ट्रांच्या स्पर्धेतील स्टेज 3 मध्ये भारतीय महिला संघाने पहिल्या फेरीत बाय मिळवून आपल्या मोहिमेची यशस्वी सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपले कौशल्य आणि जिद्द दाखवून एल साल्वाडोरचा 235-227 आणि यजमान तुर्कीचा 234-227 असा पराभव केला. यासह भारतीय महिला संघाने अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. एस्टोनियाविरुद्ध, भारतीय तिरंदाजांनी संयम आणि अचूकता राखत सलग तिसऱ्या सुवर्णपदकावर नाव कोरले.
भारताच्या महिला कंपाऊंड संघाने एप्रिलमध्ये शांघाय आणि मे महिन्यात येचिओन येथे झालेल्या विश्वचषकाच्या पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात सुवर्णपदक जिंकले होते. अशा प्रकारे या हंगामात भारतीय महिला संघ आतापर्यंत अजिंक्य राहिला आहे.
प्रियांश, अभिषेक वर्मा आणि प्रथमेश फुगे यांचा समावेश असलेल्या अव्वल मानांकित भारतीय पुरुष कंपाउंड संघाने अधिक आव्हानात्मक प्रवासाचा सामना केला. तुर्कीविरुद्ध नाट्यमय उपांत्य फेरीतील शूट-ऑफनंतर त्यांनी अंतिम फेरीतील स्थान गमावले. दोन्ही संघ 236 वर बरोबरीत होते, परंतु तुर्कीने शूट-ऑफ (30*-30) मध्ये सेंटर पॉईंटच्या जवळ शूट करून भारताला मागे टाकले.
अपयशानंतरही भारतीय पुरुष संघाने फ्रान्सविरुद्धच्या कांस्यपदकाच्या लढतीत धैर्याने झुंज दिली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारत एका गुणाने चुकला आणि 236-235 असा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले.